एक असं गाणं जे ऐकून १०० लोकांनी त्यांचं आयुष्य संपवलं आणि गायकाने आत्महत्या केली, तुम्हाला माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:50 IST2025-08-09T11:47:45+5:302025-08-09T11:50:08+5:30
जगातलं असं एक कुप्रसिद्ध गाणं ज्याच्या दंतकथा वाचल्या की आजही भीतीने थरकाप उडतो. तुम्हाला माहितीये का या गाण्याबद्दल

एक असं गाणं जे ऐकून १०० लोकांनी त्यांचं आयुष्य संपवलं आणि गायकाने आत्महत्या केली, तुम्हाला माहितीये?
जगातलं असं गाणं जे ऐकून अनेक लोकांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. इतकंच नव्हे हे गाणं ज्याने गायलं त्यानेही स्वतःचं आयुष्य संपवलं. या गाण्याचं नाव आहे 'ग्लूमी संडे'. १९३३ साली हंगेरियन संगीतकार रेज्सो सेरेस यांनी ग्लूमी संडे हे गाणे लिहिले. मूळ हंगेरियन भाषेतील या गाण्याचे नाव सॉमोरु वसारनाप म्हणजेच “दु:खद रविवार” असे होते. गाण्याचे शब्द एका व्यक्तीच्या अधुऱ्या प्रेमकहाणीवर आधारित आहेत, ज्यामध्ये तो प्रेमभंगानंतर आत्महत्या करण्याचा विचार करतो. हे गाणे अत्यंत उदास स्वरूपाचे असल्याने नंतर याला “हंगेरियन सुसाईड सॉंग” म्हणून ओळखले जाऊ लागले.
अनेक लोकांनी केली आत्महत्या
या गाण्याशी अनेक भयंकर कथा जोडल्या गेल्या. असे म्हटले जाते की, हे गाणे ऐकल्यानंतर किंवा गाण्याचे शब्द वाचल्यानंतर शंभरहून अधिक लोकांनी आत्महत्या केली. ज्यांनी आत्महत्या केली होती त्यापैकी काही लोकांच्या हातात गाण्याचे शब्द असलेले कागद सापडले, तर काहींनी आत्महत्येच्या पत्रात या गाण्याचा उल्लेख केला होता. इतकेच नव्हे तर काहींनी ऑपरेशनदरम्यान हे गाणे ऐकले आणि मृत्यू ओढवून घेतला, अशाही कहाण्या सांगितल्या जातात.
या कारणामुळे ब्रिटनमधील BBC ने या गाण्यावर अनेक दशके बंदी घातली. २००२ पर्यंत हे गाणे तिथे वाजवले जात नव्हते. मात्र मीडिया रिपोर्टनुसार या गाण्यासंबंधी ज्या दंतकथा आहेत त्यातील बऱ्याच गोष्टी अतिशयोक्तीपूर्ण आहेत. त्या काळात युद्ध, आर्थिक संकट आणि नैराश्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले होते, त्यामुळे या गाण्याशी जोडल्या गेलेल्या मृत्यूंचा थेट पुरावा नाही.
गायकानेही केली आत्महत्या
गाण्याचा लेखक रेज्सो सेरेस यांचेही आयुष्य शोकांतिकेतच संपले. १९६८ साली त्यांनी आत्महत्या केली. आपल्या गाण्यामुळे इतक्या लोकांचा जीव गेला, या भावनेत ते बराच काळ जगले, असे म्हटले जाते. आज ग्लूमी संडे हे गाणे जगभरात एक रहस्यमय आणि भयावह गाणे म्हणून ओळखले जाते. काही जण याला फक्त एक कलाकृती मानतात, तर काहींसाठी हे गाणं म्हणजे थेट मृत्यूला जवळ घेणं, असं आहे. संगीताचा लोकांच्या भावनांवर किती खोल परिणाम होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणून या गाण्याकडे पाहिलं जातं.