'द केरळ स्टोरी २' चित्रपटावर स्वरा भास्करची टीका; म्हणाली "गरजेपेक्षा जास्त द्वेष..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 10:33 IST2026-03-13T10:32:29+5:302026-03-13T10:33:02+5:30
स्वरा भास्करच्या मते या चित्रपटात गरजेपेक्षा अधिक द्वेष दाखवण्यात आला आहे.

'द केरळ स्टोरी २' चित्रपटावर स्वरा भास्करची टीका; म्हणाली "गरजेपेक्षा जास्त द्वेष..."
बॉलिवूडमधील एखादा वाद असो वा राजकीय मुद्दा अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) याबाबत खुलेपणाने बोलताना दिसते. तिची काही वादग्रस्त विधानं चर्चेचा विषय ठरत असताच. स्वरा सोशल मीडियावर नेहमीच तिचं मत परखडपणे मांडत असते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द केरला स्टोरी २: गोज बियॉन्ड' या चित्रपटावर स्वरा भास्करने प्रतिक्रिया दिली आहे.
स्वरा भास्करने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात लिहलेलं आहे की,"ज्यांनी हा चित्रपट किंवा त्याचा ट्रेलर पाहिला असेल, त्यांना स्पष्टपणे जाणवेल की यात मुस्लीम समुदायाला राक्षसासारखे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात हिंदू महिलांना अतिशय भोळ्या आणि सहज फसणाऱ्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. तसेच त्यांना त्यांच्या स्वतःच्या चुकींपासून वाचवण्यासाठी संरक्षणाची गरज आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे". स्वरा भास्करच्या मते या चित्रपटात गरजेपेक्षा अधिक द्वेष दाखवण्यात आला आहे.
'द केरला स्टोरी २: गोज बियॉन्ड' हा चित्रपट २७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनानंतर केवळ १४ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०.२१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केले असून, विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा या तीन मुख्य अभिनेत्रींच्या भूमिकेत आहेत. या तिघीही तीन मुस्लिम तरुणांच्या प्रेमात पडतात आणि त्यानंतर त्यांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते, याचे चित्रण यात आहे.