"घाबरत नाही…आता पुढील सुट्टी काश्मीरमध्येच…", पहलगाम हल्ल्यानंतर सुनील शेट्टीचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 11:06 IST2025-04-27T11:06:21+5:302025-04-27T11:06:56+5:30
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुनील शेट्टीनं देशवासीयांना एकजूट राहण्याचे आवाहन केलं आहे.

"घाबरत नाही…आता पुढील सुट्टी काश्मीरमध्येच…", पहलगाम हल्ल्यानंतर सुनील शेट्टीचा निर्णय
Suniel Shetty on Kashmir Trip: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी (Pahalgam Terror Attack ) हा खूप जास्त भयावह होता. या हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासियांमध्ये तीव्र संताप आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. दहशतवादाविरोधात भारताने कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी देशभरातून होत आहे. प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीनेही (Suniel Shetty) या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. अभिनेत्यानं त्याचा 'केसरी वीर' चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास नकार दिला. यासोबतच सुनील शेट्टीनं एक मोठा निर्णय घेतला आहे.
सुनील शेट्टीनं लोकांना त्यांची पुढची सुट्टी काश्मीरमध्येच घालवण्याचं आणि आम्ही घाबरत नाही, हे दहशतवाद्यांना दाखवून देण्याचं आवाहन केले आहे. कश्मीर आपलं होतं आणि कायम आपलं राहिलं असं त्यानं म्हटलं आहे. 'लता दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड २०२५' दरम्यान माध्यमांशी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला, "आपल्याला नागरीक म्हणून एकच करायचं आहे की, ते म्हणजे आपल्याला पुढच्या वेळी सुट्टीसाठी इतर कुठेही न जाता काश्मीरलाच जायचंय. आपण त्यांना दाखवून द्यायचे आहे की आपण घाबरत नाही".
तो म्हणाला, "आपल्यासाठी मानवतेची सेवा ही ईश्वर सेवा आहे. देव सगळं पाहतोय आणि योग्य न्याय तोच करेल. पण आता आपण भारतीय म्हणून एकत्र राहिलं पाहिजे. भीती आणि द्वेष पसरवणाऱ्यांच्या जाळ्यात अडकायचं नाही. त्यांना दाखवायचं आहे की आम्ही घाबरत नाही. आपण हे दाखवायचं आहे की कश्मीर आपलं होतं आणि आपलंचं आहे आणि कायम आपलं राहणार आहे".
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील अधिकाऱ्यांशीही बोलल्याचं अभिनेत्यानं सांगितलं. सुनील शेट्टी म्हणाला, "मी स्वतः फोन करून सांगितलं की उद्या जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही तिथे यावं, पर्यटक म्हणून किंवा कलाकार म्हणून, तिथे शूटिंग करावं लागलं किंवा तिथे सहलीला जावं लागलं, तर मी यायला तयार आहे. यात काश्मिरी मुलांची चूक नाही".