"त्याच्यात ती निरागसता नाही...",'रामायण' मधील रणबीरच्या भूमिकेबद्दल सुनील लहरींनी केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 11:20 IST2026-04-04T11:17:40+5:302026-04-04T11:20:44+5:30
'रामायण मधील रणबीरच्या भूमिकेबद्दल सुनील लहरी काय म्हणाले?

"त्याच्यात ती निरागसता नाही...",'रामायण' मधील रणबीरच्या भूमिकेबद्दल सुनील लहरींनी केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Ramayana Movie: हिंदी सिनेसृष्टीत सध्या नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर स्टारर 'रामायण' (Ramayana Movie) या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अलिकडेच या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. हा टीझर पाहून प्रेक्षक तसेच कलाकार मंडळींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत आहे.त्यात आता रामायणचा टीझर रिलीज झाल्यानंतर पुन्हा एकदा रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेविषयी चर्चा होऊ लागली आहे. जवळपास ३० वर्षांपूर्वी आलेल्या या मालिकेची आजही तितकीच क्रेझ पाहायला मिळते.
रामायण मालिकेप्रमाणे त्यातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते सुनील लहरी यांनी आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी रणबीर कपूरच्या भूमिकेविषयी देखील भाष्य केलं आहे. अरुण गोविल यांच्या भूमिकेत पाहायला मिळालेली ती निरागसता त्याच्यात नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय.
अलिकडेच डीएनएसोबत संवाद साधताना सुनील लहरी म्हणाले, केवळ टीझरच्या आधारावर एखाद्या चित्रपटाबद्दल अंदाज बांधणं योग्य नाही. आपल्याला निर्मात्याची संपूर्ण संकल्पना माहीत नसते. त्यांच्या म्हणण्यांनुसार, टीझरमध्ये भव्य सेट आणि अत्याधुनिक व्हीएफएक्स दाखवण्यात आले आहेत, पण काही गोष्टींमुळे ते निराश झाले आहेत.
त्यानंतर ते म्हणाले, रामायणचा टीझर पाहिल्यानंतर त्यात कोणतीही भावनिक ओढ जाणवली नाही. पुढे सुनील काही चित्रपटांची उदाहरणं देत म्हणाले, "द अॅव्हेंजर्स' किंवा 'टायटॅनिक'सारखे चित्रपट यशस्वी झाले कारण त्यांत प्रखर भावना होत्या. रामानंद सागर यांच्या रामायणात कदाचित उत्तम व्हीएफएक्स किंवा त्याचे मोठे बजेट नसेल, पण त्यातील भावना इतक्या तीव्र होत्या की ३८ वर्षांनंतरही लोक त्याला भारतीय महाकाव्याचं सर्वोत्तम रूपांतर मानतात. तुम्ही ४०००-५००० कोटी रुपये खर्च करा, पण जर भावनिक पैलू मजबूत नसेल, तर लोक त्या कलाकृतीसोबत एकरूप होणार नाहीत."
रणबीर कपूरच्या भूमिकेबद्दल काय म्हणाले?
"यामध्ये रणबीर चांगलाच दिसतो, पण त्याच्या चेहऱ्यावर निरागसपणा नाही.अरुण गोविल यांच्या चेहऱ्यावर जो संयम आणि निरागसता दिसायची, त्याच्या भूमिकेत ती थोडी कमतरता जाणवते. आता दिसत नाही. पण मला खात्री आहे की, तो आपल्या अभिनयानं रामाच्या भूमिकेला न्याय देईल." असं सुनील लहरी यांनी यावेळी सांगितलं.