संजय दत्तने सांगितल्या तुरुंगातील आठवणी; म्हणाला - 'ते कठीण दिवस होते, तिथे रोज मी...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 18:53 IST2023-10-06T18:49:38+5:302023-10-06T18:53:18+5:30
संजय दत्तने एका मुलाखतीमध्ये पुण्याच्या येरवडा तुरुंगातील आठवण सांगितल्या.

Sanjay Dutt
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने कधी रोमँटिक तर कधी डॅशिंग हिरो वा खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं. चित्रपटांप्रमाणेच खाजगी आयुष्य कायमच चर्चेत राहिलं. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होतं. त्याने सुमारे पाच वर्षे तुरुंगात घालवली होती. नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्यानं पुण्याच्या येरवडा तुरुंगातील आठवण सांगितल्या.
संजय दत्तने सांगितलं, जेव्हा मी पहिल्यांदा ठाणे तुरुंगात गेलो, तेव्हा सुनील शेट्टी, अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान, सगळे तिथे आले होते. शिक्षा भोगण्यासाठी मला कोणतीही सवलत मिळाली नव्हती. त्यामुळे शिक्षा भोगण्यासाठी मला जावेच लागणार, असे मला स्वतःला तयार करायचे होते. सहा वर्ष मी त्याला सामोरा गेलो आणि त्यातून बरचं शिकलो. तुरुंगात असतानाचा मी तिथे रोज स्वयंपाक शिकलो, धर्मग्रंथ वाचले आणि व्यायाम केला. मी चांगले शरीर घेऊन बाहेर आलो".
१९९३ च्या बॉम्बस्फोटादरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरल्यानंतर संजय दत्तला मे २०१३ मध्ये पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाच वर्षांच्या शिक्षेपैकी सुमारे ४२ महिने त्याने तुरुंगवास भोगला, कारण खटल्यादरम्यान तो १८ महिने तुरुंगात होता.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर KGF 2 आणि शमशेरामधील दमदार भुमिकेनंतर संजय दत्त आता 'लिओ' या चित्रपटात खलनायक बनला आहे. साऊथ स्टार विजय थलापथीच्या 'लिओ' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे संजय खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले असून हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. 'लिओ' 19 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.