'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये दिसला असता 'हा' अभिनेता, त्याच्या नकारानंतर रोहित शेट्टीने स्क्रिप्टच बदलली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:10 IST2026-01-25T14:09:53+5:302026-01-25T14:10:32+5:30
स्क्रिप्ट बदलल्यानंतर रोहित शेट्टीने सिनेमात शाहरुख खानला घेतलं

'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये दिसला असता 'हा' अभिनेता, त्याच्या नकारानंतर रोहित शेट्टीने स्क्रिप्टच बदलली अन्...
रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला 'चेन्नई एक्सप्रेस' हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो. मात्र, फार कमी लोकांना माहिती आहे की, या चित्रपटासाठी शाहरुख खान ही पहिली पसंती नव्हती. सुरुवातीला रोहित शेट्टीला हा चित्रपट एका तरुण अभिनेत्यासोबत करायचा होता आणि त्यासाठी त्याने 'जाने तू या जाने ना' फेम इमरान खानला विचारणा केली होती. त्या काळात इमरान खान हा चॉकलेट बॉय म्हणून लोकप्रिय होता आणि त्याचे अनेक चित्रपट हिट ठरत होते, त्यामुळे रोहितला तो या भूमिकेसाठी योग्य वाटला होता.
इमरान खानने का नाकारला सिनेमा?
इमरान खानला जेव्हा या चित्रपटाची कथा ऐकवण्यात आली, तेव्हा तारखा जुळत नसल्यामुळे त्याने या मोठ्या प्रोजेक्टला नकार दिला. तसंच अशीही चर्चा होती की इमरान खानला त्यावेळी चित्रपटाची स्क्रिप्ट त्याच्यासाठी योग्य वाटली नाही. नुकतंच एका मुलाखतीत इमरान म्हणाला, "रोहित शेट्टीपबरोबर माझी चर्चा झाली होती. मला सिनेमाची कहाणी खूप मजेशीर वाटली. पण मला वाटलं की मी हे नीट करु शकणार नाही. त्यांना सिनेमा मजेदार बनवायचा होता आणि मी त्यात स्वत:ला फिट बसलेला बघू शकत नव्हतो. तसंही शाहरुख खानने नंतर सिनेमा खूप सुंदर केला. मला तसा करता आला नसता."
इमरानने नकार दिल्यानंतर रोहित शेट्टीने या कथेमध्ये काही बदल केले आणि त्यानंतर तो हा प्रस्ताव घेऊन शाहरुख खानकडे गेला. शाहरुखला ही कथा प्रचंड आवडली आणि त्याने लगेचच या चित्रपटासाठी होकार दिला. तसंच शाहरुखची अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणची एन्ट्री झाली. यानंतर सिनेमा ब्लॉकबस्टर झाला.
जर इमरान खानने या चित्रपटासाठी होकार दिला असता, तर आज 'चेन्नई एक्सप्रेस'चे स्वरूप पूर्णपणे वेगळे दिसले असते. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या केमिस्ट्रीने या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आणि बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम प्रस्थापित केले. हा चित्रपट नाकारणे इमरान खानच्या करिअरमधील एक मोठी चूक मानली जाते, कारण त्यानंतर इमरानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आणि हळूहळू तो अभिनय क्षेत्रापासून दूर गेला. दुसरीकडे, 'चेन्नई एक्सप्रेस' शाहरुखच्या करिअरमधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.