साई पल्लवीच 'सीता' का? रणबीर कपूरनं सांगितलं कारण, म्हणाला "सेटवर पहिल्याच दिवशी कळलं की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:15 IST2026-04-03T15:14:16+5:302026-04-03T15:15:35+5:30
रणबीर कपूरनं केलं साई पल्लवीचं कौतुक; म्हणाला, "तिला सीतेच्या भूमिकेत पाहिलं तेव्हा..."

साई पल्लवीच 'सीता' का? रणबीर कपूरनं सांगितलं कारण, म्हणाला "सेटवर पहिल्याच दिवशी कळलं की..."
, Ranbir Kapoor Reaction Sai Pallavi Sita : 'रामायण' या बहुप्रतिक्षित सिनेमाचा टीझर काल हनुमान जयंतीचं औचित्य साधून निर्मात्यांनी रिलीज केला. टीझर प्रदर्शित झाल्यावर रणबीरचा पहिला लूक अधिकृतरित्या समोर आला. शांत, संयमी रुपात रणबीर पाहायला मिळाला. या टीझरमध्ये सीता माताच्या भुमिकेत असेलेल्या साई पल्लवीची एक छोटी झलक दाखवण्यात आली. आता तिचा पूर्ण लूक पाहण्यासाठी चाहते आता व्याकुळ झाले आहेत. अशातच रणबीर कपूरने एक खुलासा केला की, जेव्हा त्याने पहिल्यांदा साई पल्लवी हिला सीतेच्या रूपात पाहिले, तेव्हा त्याच्या मनात नेमक्या काय भावना होत्या.
भारतात काल टीझर प्रदर्शित करण्यापुर्वी रामायणचा टीझर हा लॉस एंजेलिसमधील एका भव्य कार्यक्रमात पहिले प्रदर्शित झाला होता. या सोहळ्यात रणबीरला साई पल्लवीबद्दल विचारल्यानंतर त्यानं प्रतिक्रिया देत ती या चित्रपटासाठी योग्य निवड असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, "जसं आपण सगळ्यांनाच माहिती आहे की साई किती अप्रतिम अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाने खूप मोठं यश मिळवलं आहे. पहिल्याच दिवशी, जेव्हा मी तिला सीतेच्या रूपात पाहिलं, तेव्हा मी फक्त नितेश सरांकडे पाहिलं आणि आम्हा दोघांनाही लगेच जाणवलं की या भूमिकेसाठी तिच्यापेक्षा योग्य चेहरा दुसरा कोणताही असू शकत नाही".
Ranbir On How he Felt After Watching Sai Pallavi first time as Sita Ji.#Ramayanapic.twitter.com/EvelZmnSzc
— RK🐰 (@rksbunny) April 2, 2026
केवळ सीताच नाही, तर रावणाच्या भूमिकेतील दाक्षिणात्य सुपरस्टार यशबद्दलही रणबीरने भाष्य केले. तो म्हणाला, "रावणासारख्या शक्तिशाली आणि भव्य पात्रासाठी यशकडे जे स्टारडम आणि 'स्क्रीन प्रेझेन्स' आहे, त्याचीच गरज होती. यश या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे". टीझरमध्ये यशची एक छोटी झलक दाखवण्यात आली असून, पूर्ण लूक पाहण्यासाठी चाहते आता व्याकुळ झाले आहेत.
कधी प्रदर्शित होणार रामायण सिनेमा
बिग बजेट ऐतिहासिक सिनेमाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. प्रेक्षकांना दोन भागांमध्ये हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांनी जाहीर केल्यानुसार, 'रामायण - भाग १' २०२६ च्या दिवाळीत जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत भेटीला येणार आहे. ४,००० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट भारतीय सिनेमाचा इतिहास बदलणार असल्याचा दावा केला जात आहे.