अक्षय कुमारला प्रियदर्शन का म्हणाले 'राक्षस'? १४ वर्षांनंतर एकत्र येण्यामागचं उघड केलं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 12:16 IST2026-04-05T12:16:06+5:302026-04-05T12:16:40+5:30
प्रियदर्शन यांनी अक्षय कुमारसोबत वारंवार काम करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

अक्षय कुमारला प्रियदर्शन का म्हणाले 'राक्षस'? १४ वर्षांनंतर एकत्र येण्यामागचं उघड केलं खरं कारण
दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अभिनेता अक्षय कुमार ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी जोडींपैकी एक आहे, जी 'हेरा फेरी', 'गरम मसाला', 'भागम भाग' यांसारख्या लोकप्रिय कॉमेडी चित्रपटांनंतर तब्बल १४ वर्षांनी 'भूत बंगला' (Bhooth Bangla) या हॉरर-कॉमेडी चित्रपटाद्वारे पुन्हा एकत्र आले आहेत. अशातच प्रियदर्शन यांनी अक्षय कुमारसोबत वारंवार काम करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
मल्याळममधील एका म्हणीचा दाखला देत प्रियदर्शन म्हणाले, "जेव्हा तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात पुरेसे लोणी असते, तेव्हा तुपाचा शोध घेण्याची गरज भासत नाही". अक्षय कुमार, परेश रावल आणि राजपाल यादव हे कलाकार त्यांच्यासाठी 'अनमोल धन' असल्याचं प्रियदर्श यांनी म्हटलं. अक्षय कुमार हा त्यांच्यासाठी एका 'ओळखीच्या राक्षसा'सारखा (Known Devil) आहे, ज्याच्यावर ते डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात. "अनोळखी देवदूतांपेक्षा ओळखीचे राक्षस नेहमीच बरे असतात", असे मिश्किल विधान त्यांनी केले.
प्रियदर्शन यांच्या मते, अक्षय त्यांची संकल्पना आणि 'कॉमेडी टायमिंग' इतक्या अचूकपणे समजतो की, त्यांना जास्त दिग्दर्शन किंवा सुधारणा करण्याची गरज भासत नाही. 'हेरा फेरी', 'भूल भुलैया', 'गरम मसाला' आणि 'खट्टा मीठा' यांसारख्या कल्ट क्लासिक चित्रपटांनंतर आता 'भूत बंगला'मध्ये ही जादू पुन्हा पाहायला मिळणार आहे.
'भूत बंगला' कधी प्रदर्शित होणार?
अक्षय कुमारचा हा बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, १६ एप्रिल रोजी या चित्रपटाचा भव्य 'प्रिव्ह्यू' आयोजित करण्यात आला आहे. एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, अक्षयच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.