'सीक्वेल बऱ्याचदा फ्लॉप होतात...', नीना गुप्ता यांनी मांडलं मत; 'धुरंधर २'बद्दल म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 09:33 IST2026-02-08T09:28:37+5:302026-02-08T09:33:54+5:30
नीना गुप्तांचा 'वध २' नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. तरी नीना गुप्तांनी असं वक्तव्य का केलं?

'सीक्वेल बऱ्याचदा फ्लॉप होतात...', नीना गुप्ता यांनी मांडलं मत; 'धुरंधर २'बद्दल म्हणाल्या...
नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांचा 'वध २' थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसतोय. सोशल मीडियावरही सिनेमाचीच चर्चा आहे. यादरम्यान नीना गुप्ता यांनी सीक्वेल नेहमीच चालत नाहीत असं मत मांडलं आहे. सोबतच त्यांनी 'धुरंधर २'वरही भाष्य केलं. सीक्वेलकडून प्रेक्षकांना मोठी अपेक्षा असते. त्यांनाही तेच हवं असतं पण दिग्दर्शकाने आधीच गोष्टीचा निष्कर्ष काढलेला असतो.
टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी बॉलिवूडमधील सीक्वेल्सवर चर्चा केली. त्या म्हणाल्या, "पहिल्या सिनेमाच्या यशानंतर फिल्ममेकर्स दुसऱ्या सिनेमात नवीन एलिमेंट्स जोडण्याचा प्रयत्न करतात. मात्र बॉलिवूडमध्ये बहुतांश सीक्वेल हे फ्लॉप होतात. 'वध २' हा सीक्वेल आहे पण गोष्ट वेगळी आहे. मेकर्सने मुख्य भूमिकांमध्ये तेच कलाकार ठेवले आहेत आणि प्रेक्षकांना कंटेंट वेगळा दिला आहे. दिग्दर्शकाचा हा निर्णय एकदम योग्य होता. सीक्वेल्सची जादू पहिल्यासारखीच ठेवण्यात अनेकदा दिग्दर्शक अपयशी ठरतात. परिणामी ते प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरे उतरत नाहीत. त्यांना अशाच गोष्टी हव्या असतात पण दिग्दर्शकांनी त्यांच्या डोक्यात गोष्ट पूर्ण केलेली असते."
रणवीर सिंहच्या 'धुरंधर २'बद्दल नीना गुप्ता म्हणाल्या, "मला धुरंधरविषयी जास्त काही माहित नाही. सीक्वेल बनवताना दिग्दर्शकाने त्याबद्दल काय विचार केला आहे याची मला कल्पना नाही."
२०२२ साली 'वध' आला होता. तेव्हा सिनेमाने पहिल्या दिवशी १० लाखांची कमाई केली होती. तर 'वध २' नुकताच ६ फेब्रुवारी रोजी रिलीज झाला. पहिल्या दिवशी सिनेमाने थेट ५० लाखांचा गल्ला जमवला. आता वीकेंडला सिनेमा किती कमावतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.