विशाल ददलानीचा 'वशिला' लावणाऱ्यांना इशारा; थेट मंत्र्यालाच केलं ब्लॉक; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 10:28 IST2026-02-10T10:27:46+5:302026-02-10T10:28:44+5:30
ओळख लावून काम हवं असेल तर मी कधीच भेटणार नाही, विशाल ददलानी स्पष्टच बोलला

विशाल ददलानीचा 'वशिला' लावणाऱ्यांना इशारा; थेट मंत्र्यालाच केलं ब्लॉक; म्हणाला...
बॉलिवूडसंगीतकारविशाल ददलानी अनेकदा सोशल मीडियावर रोखठोक मत मांडताना दिसतो. राजकारणावरही तो भाष्य करतो. त्याच्या पोस्ट नेहमी व्हायरल होतात. नवोदित गायकांना आता त्याने एक इशारा दिला आहे. एखाद्या मंत्र्याच्या ओळखीने माझ्याकडे कामासाठी शिफारस घेऊन आलेलं चालणार नाही अशी त्याने ताकीद दिली आहे. नुकतंच त्याने एका नवोदित गायकाला आणि मंत्र्याला थेट ब्लॉक केलं आहे. नक्की काय म्हणाला विशाल ददलानी?
विशाल ददलानीने सोशल मीडियावर लिहिले, "नवोदित गायकांना माझा एक सल्ला आहे. कोणा मंत्रीजी किंवा त्यांच्या सेक्रेटरीच्या ओळखीने मला फोन करु नका किंवा त्यांनाही करायला सांगू नका. असं करुन तर मी तुम्हाला कधीच भेटणार नाही हे नक्की. ओळखीने पुढे येणाऱ्या लोकांबद्दल मला शून्य रस आहे. आताच एकाने असा प्रयत्न केला तेव्हा मी त्या मंत्रींजींना तर ब्लॉक केलंय आणि तुलाही केलंय. आता तू कितीही चांगला गायक असलास तरी मला तुझ्यासोबत काम करण्यात काहीच रस नाही. सॉरी."
पुढे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले,"स्वत:च्या कौशल्यावर विश्वास ठेवा. मेहनत करण्यासाठी तयार राहा आणि जरा संयम बाळगा. जर तुम्ही खरंच टॅलेंटेड असाल तर तुमची वेळ नक्की येईल. पुन्हा अशा शिफारसी आणू नका. हे खूप जुनाट विचारांचं आहे आणि यातून हेच सिद्ध होतं की तुमचा तुमच्याच प्रतिभेवर विश्वास नाही."
या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत विशाल ददलानीला पाठिंबा दिला आहे. तर कॉमेडियन मुन्नावर फारुकीने मजेशीर कमेंट करत लिहिले,'सर, माझ्या मॅनेजरने ट्रू कॉलरवर त्याचं आयडी मंत्री असं ठेवलं आहे. प्लीज त्याला अनब्लॉक करा'. यावर विशालने रिप्लाय देत लिहिले,'तू अशा मॅनेजरला कामावर ठेवलं आहे चांगलं आहे. आता एक वकील असा आयडी असलेलाही बघ.'
विशाल-शेखर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी आहे. 'दोस्ताना','अंजाना अंजानी','फायटर','रा वन','टायगर जिंदा है','बचना ए हसीनो' अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत आणि संगीत दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी विशाल ददलानीची आणखी एक पोस्ट चर्चेत होती. अरिजित सिंहने पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने पोस्ट करत लिहिले, 'तुम्ही काय शिकलात? यश हे शांती, श्रीमंती आणि पॉवरच्या सुरक्षेची गॅरंटी घेत नाही. आयुष्य फार छोटं आहे आणि विचित्रही आहे. आपल्या आयुष्याचा एकही क्षण वाया घालवू नका. स्वत:शीच खोटं बोलू नका. दुसऱ्यांसारखं बनायला जाऊ नका. आयुष्य मस्त जगा हेच मी सांगू शकतो.'