अतुल कुलकर्णींची ६ शब्दांची पोस्ट, महानगरपालिका निकालांदरम्यान मोजक्या शब्दांत मांडलं वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:02 IST2026-01-16T17:00:26+5:302026-01-16T17:02:21+5:30
महानगरपालिका निकालांदरम्यान अभिनेते अतुल कुलकर्णीं यांच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अतुल कुलकर्णींची ६ शब्दांची पोस्ट, महानगरपालिका निकालांदरम्यान मोजक्या शब्दांत मांडलं वास्तव
Atul Kulkarni on Maharashtra Election Results 2026 : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल १५ जानेवारी रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर आज १६ जानेवारी रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या प्रमुख महापालिकांमध्ये भाजपा महायुतीने जोरदार विजय मिळवला आहे. मुंबईत गेल्या २५ वर्षांची ठाकरेंची सत्ता पालटत भाजपाने महायुतीने तब्बल १३० जागांपर्यंत मुसंडी मारली आहे. या महानगरपालिका निकालांदरम्यान अभिनेते अतुल कुलकर्णीं यांच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अतुल कुलकर्णी हे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अनेक मुद्द्यांवर त्यांची मतं मांडत असतात. आता महानगरपालिकांचे निकाल समोर येताना, अतुल कुलकर्णीं यांनी फक्त ६ शब्दांची पोस्ट शेअर केली आहे. "हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र" एवढंच अतुल कुलकर्णी यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अनुक्रमे ६ राज्यांची नावे घेतली आहेत. या सर्व राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीही आता याच हिंदी पट्ट्यातील राज्यांसारखी झाली आहे, अशी पोस्ट अतुल कुलकर्णींनी केली आहे.
दरम्यान, काल महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान बोटाला लावण्यात येणारी शाई सहज पुसली जात असल्याच्या तक्रारी राज्यभरातून आल्या होत्या. 'मार्कर' शाईवरून सुरू असलेल्या वादावर अतुल कुलकर्णी यांनी आपल्या लेखणीतून भाष्य केलं होतं.
स्वच्छं बोट! व्वा! हे मात्रं बेष्टं झालं
बोट म्हणे स्वच्छं झालं
मेमरी तशी शॉर्टंच असते
शाई उगाच डिवचत राहते
व्वा! हे कसं बेष्टं झालं
बोट म्हणे स्वच्छं झालं
कर्तव्याचा भार नको
अपेक्षांचं ओझं नको
व्वा! हे कसं बेष्टं झालं
बोट म्हणे स्वच्छ झालं
आपण मोकळे तेही मोकळे
उद्या पासून जुनेच सापळे
व्वा! हे कसं बेष्टं झालं
बोट म्हणे स्वच्छ झालं
प्रेशर दक्षतेचं नकोच घेऊया
नागरिक नको, लाभार्थी होऊया
व्वा! हे कसं बेष्टं झालं
बोट म्हणे स्वच्छ झालं
मार्कर आता पाच वर्षं म्यान
सेवक, सेविका, मोकळं रान
व्वा! हे कसं बेष्टं झालं
बोट म्हणे स्वच्छ झालं
-अतुल कुलकर्णी