"मी कधीही कायदा मोडला नाही…"; ओशिवारा गोळीबार प्रकरणावर कमाल खानने अखेर सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:20 IST2026-02-02T13:18:25+5:302026-02-02T13:20:38+5:30
ओशिवारा गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला-"कोण बरोबर आणि कोण चूक याचा निर्णय..."

"मी कधीही कायदा मोडला नाही…"; ओशिवारा गोळीबार प्रकरणावर कमाल खानने अखेर सोडलं मौन
Kamal Khan:बॉलिवूड अभिनेता कमाल खान कायमच त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. मात्र,सध्या हा अभिनेता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. अलिकडेच कमाल आर खान उर्फ KRK ला मुंबईतील ओशिवारा परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या तपासादरम्यान चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. परवानाधारक बंदुकीने गोळीबार केल्याच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पण, याप्रकरणी आता केआरकेला कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. या गोळीबाराच्या घटनेवर पहिल्यांदाच अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, जामिनावर बाहेर आल्यानंतर अभिनेता कमाल खानने ANI शी बोलताना म्हटलं, गेल्या २२ वर्षांपासून माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे आणि या २२ वर्षांत मी आजपर्यंत कधीही कायदा मोडला नाही. पोलिसांनी त्यांचं काम केलं आहे. त्यांना नक्कीच काहीतरी संशय आला असेल, त्यामुळे असं घडलं, पण कोण बरोबर आणि कोण चूक हे मी सांगू शकत नाही.याचा निर्णय न्यायालय घेईल." अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने दिली आहे.
काय घडलेलं?
दरम्यान, १८ जानेवारीला लोखंडवाला येथील नालंदा इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील रहिवाशांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. रहिवासी बाहेर आले असता त्यांना इमारतीच्या आवारात दोन गोळ्या आढळल्या. तसेच भिंतीवर गोळ्या लागल्याचे निशाणही दिसले. त्यांनी त्वरित पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना तपास करताना नालंदा सोसायटीमध्ये दोन गोळ्या सापडल्या आहेत. यातील एक गोळी दुसऱ्या मजल्यावर, तर दुसरी गोळी चौथ्या मजल्यावर आढळून आली. यातील एक फ्लॅट एका लेखक-दिग्दर्शकाचा आहे, तर दुसरा फ्लॅट एका मॉडेलचा असल्याचं समजलं.
कमाल खानने २००८ मध्ये आलेल्या 'देशद्रोही' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती आणि तो स्वतःच निर्मित केला होता. त्यानंतर ते २०१४ मध्ये 'एक व्हिलन' चित्रपटात सहाय्यक भूमिकेत तो दिसला.