"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:13 IST2025-12-26T11:12:41+5:302025-12-26T11:13:23+5:30
बांगलादेशमधील हिंदूंच्या हत्येवर बोलली जान्हवी कपूर, सर्वांना केलं जागरुक

"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
बांगलादेशमध्ये हिंदूंच्या हत्येमुळे सगळेच संतापले आहेत. अनेक जण सोशल मीडियावर राग व्यक्त करत आहेत. इतर देशांना नेहमी पाठिंबा देणारे बॉलिवूड सेलिब्रिटी आज बांग्लादेशमधील हिंदूंच्या हत्येवर गप्प का अशी अनेकदा सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तक्रार येत असते. दरम्यान अभिनेत्री जान्हवी कपूर पुढे आली आहे. तिने स्टोरी शेअर करत घटनेचा निषेध केला आहे. जान्हवी काय म्हणाली वाचा
१८ डिसेंबर रोजी बांग्लादेशमध्ये हिंदू युवक दीपू चंद्र दासची क्रूर हत्या झाली. भारतातूनही या घटनेचा निषेध दर्शवला होता. आता अभिनेत्री जान्हवी कपूरने स्टोरी शेअर करत राग व्यक्त केला आहे. तिने लिहिले,"बांगलादेशमध्ये जे घडतंय ते अत्यंत क्रूर आहे. हा नरसंहार आहे आणि हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. जर तुम्हाला या अमानवी सार्वजनिक हत्येविषयी माहित नसेल तर वाचा, व्हिडीओ पाहा आणि प्रश्न विचारा. आणि एवढं करुनही तुमच्या मनात संताप निर्माण झाला नाही तर एक दिवस हाच ढोंगीपणा आपल्या सर्वांना नष्ट करेल."
ती पुढे लिहिते, "जगात दुसऱ्या कोपऱ्यात घडणाऱ्या घटनांवर आपण अश्रू गाळत असू तेव्हा आपल्याच भाऊ बहिणींना जिवंत जाळलं जाईल. माणूसकीचा विसर पडण्याच्या आत प्रत्येकाने कोणत्याही स्वरुपातील अतिरेकीपणाचा निषेध केला पाहिजे. आपण केवळ एक प्यादे आहोत जे अदृश्य रेषेच्या आर किंवा पार उभे आहोत. हे ओळखा आणि निष्पाप लोकांना मारलं जात आहे त्यांच्यासाठी उभे राहा."

जान्हवी कपूरशिवाय याआधी रवीना टंडन, दीया मिर्झा, मुनव्वर फारुकी यांनी सुद्धा बांग्लादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या हत्येवर आक्रोश व्यक्त केला. पीटीआय रिपोर्टनुसार, बांगलादेशमधील मैमनसिंहच्या भालुका तालिक्यात एक हिंदी कपडा फॅक्टरी मजूर दीपू चंद्र दासला जमावाने मारहाण केी आणि फासावर लटकवून जिवंत जाळलं. या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या अनेकांना नंतर अटक करण्यात आली.