ईशा गुप्तानंतर दुबईत अडकलेली सोनल चौहानही भारतात परतली, म्हणाली- "मागचे काही दिवस कठीण होते, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 10:13 IST2026-03-04T10:13:11+5:302026-03-04T10:13:39+5:30
युद्धाचा विमानसेवेवर परिणाम झाल्याने काही सेलिब्रिटीही परदेशात अडकले होते. आता हळूहळू भारतीय नागरिकांना परदेशातून सुखरुप परत आणण्याचे काम सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सुखरुप भारतात परतली आहे. तर ईशा गुप्तानंतर अभिनेत्री सोनल चौहानही मायदेशी परतली आहे.

ईशा गुप्तानंतर दुबईत अडकलेली सोनल चौहानही भारतात परतली, म्हणाली- "मागचे काही दिवस कठीण होते, पण..."
अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटले आहेत. भारतातील अनेक नागरिक हे परदेशात अडकून पडले आहेत. या युद्धाचा विमानसेवेवर परिणाम झाल्याने काही सेलिब्रिटीही परदेशात अडकले होते. आता हळूहळू भारतीय नागरिकांना परदेशातून सुखरुप परत आणण्याचे काम सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सुखरुप भारतात परतली आहे. तर ईशा गुप्तानंतर अभिनेत्री सोनल चौहानही मायदेशी परतली आहे.
सोनल चौहानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबाबत सांगितलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सोनल म्हणते, "मी भारतात परत आली आहे. स्वत:ला खूप भाग्यवान समजते. तुमचं प्रेम, प्रार्थना आणि मेसेज करून विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद. मी आता भारतात सुखरुप परतली आहे. मागचे काही दिवस खूपच कठीण होते. मात्र या दिवसांत दुबईचं साहस आणि दृढता दिसली. त्यांच्या सरकारवर त्यांचा विश्वास आहे. दुबई सरकारने एवढ्या कठीण परिस्थितीत आम्हाला सुरक्षित ठेवलं, सगळं काही व्यवस्थितपणे सांभाळलं आणि आम्हाला सुरक्षित वाटेल याचीही काळजी घेतली यासाठी मी त्यांची आभारी आहे".

"हे सगळं लवकर संपेल, अशी मी आशा बाळगते. कारण युद्ध हे कधीच उत्तर असू शकत नाही. या कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रार्थना करते. सगळं काही लवकर संपून शांतता होण्यासाठीही मी प्रार्थना करेन", असंही तिने म्हटलं आहे. दुबई आणि इतर देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातीलही बरेचसे लोक परदेशात अडकून पडले आहेत.