'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:55 IST2025-12-12T13:54:53+5:302025-12-12T13:55:42+5:30
'Jumma Girl' Kimi Katkar : अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'जुम्मा चुम्मा' गाण्यामुळे रातोरात लोकप्रिय झालेल्या किमी काटकरने १९९२ मध्ये अचानक चित्रपटसृष्टी सोडली आणि ती ऑस्ट्रेलियाला निघून गेली. आता ३३ वर्षांनंतर तिचा सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो पाहून सगळे थक्क झाले. किमी खूप बदलली आहे.

'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
तुम्हाला किमी काटकर आठवते का? 'जुम्मा चुम्मा' गाणं केल्यानंतर ती 'जुम्मा गर्ल' म्हणून प्रसिद्ध झाली होती. पण १९९२ मध्ये किमी काटकरने अचानक सिनेइंडस्ट्री सोडली आणि ती लोकांच्या नजरेपासून दूर झाली. आता ३३ वर्षांनंतर ती सोशल मीडियावर लोकांसमोर आली तेव्हा सगळेजण चकित झाले. चाहत्यांनाही किमी काटकरला ओळखता आले नाही.
एक काळ होता जेव्हा किमी काटकरची गणना बॉलिवूडमधील सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये केली जात असे, पण ३३ वर्षांत ती खूप बदलली आहे. किमी काटकरचा जो नवीन फोटो समोर आला आहे, तो व्हायरल होत आहे. हा फोटो अभिनेत्री दिव्या सेठने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. एका फोटोत दिव्या आणि किमी एकत्र दिसत आहेत, तर दुसरा फोटो थोडा जुना आहे. कारण यात किमी, दिव्या सेठच्या दिवंगत मुलीसोबत पोज देताना दिसत आहे.
किमी काटकरने १९८५ मध्ये 'पत्थर दिल' चित्रपटातील सहायक भूमिकेतून अभिनयात पदार्पण केले. त्याच वर्षी ती 'अॅडव्हेंचर्स ऑफ टार्झन' चित्रपटात दिसली होती. पण किमीला खरी लोकप्रियता १९९१ मध्ये आलेल्या 'हम' चित्रपटातून मिळाली. यात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली होती आणि 'जुम्मा चुम्मा दे दे' या गाण्यामुळे ती रातोरात स्टार झाली. किमी काटकरने 'मेरा लहू', 'दरिया दिल', 'गैर कानूनी', 'वर्दी' आणि 'मर्द की जुबान' यांसारखे अनेक चित्रपट केले आणि मग १९९२ मध्ये चित्रपटसृष्टी सोडली. १९९२ मध्ये आलेला 'हमला' हा तिचा शेवटचा चित्रपट असल्याचे सांगितले जाते. किमी काटकरने अचानक चित्रपट सोडल्याने त्यावेळी चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, याचे कारणही समोर आले होते.
...आणि इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला
एका मुलाखतीत किमी काटकरने बॉलिवूड सोडण्याचे कारण सांगितले होते. तिने म्हटले होते की, ती अभिनयाने कंटाळली होती आणि चित्रपटसृष्टीला वैतागली होती. तिने फोटोग्राफर शांतनु शौरीशी लग्न केले आणि इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला. २००९ मध्ये 'इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत किमी काटकर म्हणाली होती की, "मला वाटते की मी योग्य वेळी इंडस्ट्री सोडली. 'हम'मध्ये अमित (अमिताभ बच्चन) यांच्यासोबत काम केल्यानंतर मी अजून काय करू शकले असते? मी १७ वर्षांची असल्यापासून मॉडेलिंग करत होते. १०-११ वर्षे सतत काम केल्यानंतर, मला कळले की आता स्थिर होण्याची वेळ आली आहे."
ती सध्या काय करते?
किमी काटकरने सांगितले होते की, 'हम' नंतर तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या, पण तिने शांतनुला लग्नासाठी 'हो' म्हटले होते, त्यामुळे तिने त्या सर्व नाकारल्या. इतकेच नव्हे, तर त्यावेळी त्यांना अनेक चित्रपटांचे साइनिंग अमाऊंट देखील परत करावे लागले होते. शांतनुशी लग्नानंतर काही वर्षांनी किमी काटकर मेलबर्न येथे निघून गेल्या. त्यावेळी त्यांचा मुलगा सिद्धांत ९ वर्षांचा होता. त्या वेळी त्यांच्या मुलाला एका जीवघेण्या आजाराची लागण झाली होती, ज्यामुळे डॉक्टरांनी त्यांना परदेशात जाऊन मुलावर उपचार करण्याचा सल्ला दिला होता. किमी लगेच ऑस्ट्रेलियाला गेल्या, पण मुलासाठी तिथेच स्थायिक व्हावे लागेल, याची तिला कल्पना नव्हती. किमी काटकर सुमारे ५ वर्षे ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये राहिली आणि आता ती बऱ्याच काळापासून पती आणि मुलासोबत गोव्यात आहेत. तिचे पती शांतनु हे गोव्यातील The One School Goa चे संस्थापक आहेत. तर, किमी चित्रपट सोडल्यानंतरपासून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहे.