'साउथमध्ये असले नखरे नाहीत', बॉलिवूडच्या 'या' गोष्टीवर भडकले दिग्दर्शक प्रियदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 15:21 IST2026-04-04T15:20:51+5:302026-04-04T15:21:45+5:30
'ही' बॉलिवूडमधील सर्वात वाईट गोष्ट आहे, दिग्दर्शक प्रियदर्शन स्पष्टच बोलले

'साउथमध्ये असले नखरे नाहीत', बॉलिवूडच्या 'या' गोष्टीवर भडकले दिग्दर्शक प्रियदर्शन
'भूल भुलैया','हेरा फेरी','हंगामा' सारखे सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी बॉलिवूडमधील एका गोष्टीवर संताप व्यक्त केला. 'आजकाल कलाकारांसोबत त्यांची ५०-६० जणांची टीम असते. त्यांच्यामुळे मी माझी साधी फ्रेमही नीट बघू शकत नाही' असं ते म्हणाले. बॉलिवूडमधील 'एनटूराज कल्चर'मुळे काय नुकसान होतं हेही त्यांनी सांगितलं. नक्की काय म्हणाले प्रियदर्शन?
फिल्मफेअरशी बोलताना प्रियदर्शन म्हणाले, "मला या गोष्टीची खरोखरंच चीड येते. ही बॉलिवूडमधील सर्वात वाईट गोष्ट आहे. जिथे चार कलाकार असतात तिथे त्यांच्यासोबत ६० लोकांचा गराडा असतो. ते लोक सगळीकडे असतात आणि मी सतत 'प्लिज क्लियर, प्लिज क्लियर' असं सांगत राहतो. खूप गर्दी होते. माझ्या पूर्ण सेटअपपेक्षाही जास्त सामान आणि लोक या कलाकारांसोबत असतात."
ते पुढे म्हणाले, "या स्टार्सचा लवाजमा असरानी यांच्या दिग्गज कलाकारांपेक्षाही जास्त कमावतो. या बकवास गोष्टी साउथ इंडस्ट्रीत होत नाहीत. जर साउथ स्टार्ससोबत त्यांचा लवाजमा आला जरी तरी तो सेटच्या बाहेरपर्यंतच असतो. जेव्हा कलाकार बोलवतात तेव्हाच ते लोक आतमध्ये येतात. पण इथे बॉलिवूडमध्ये हे लोक सतत सेटवरच येऊन उभे राहतात."
अभिनेता असरानी यांची आठवण काढत प्रियदर्शन म्हणाले, "असरानी सरांसोबत काम करायला मिळालं हे माझं भाग्यच आहे. मी त्यांच्यासोबत नुकतेच दोन सिनेमे पूर्ण केले. एका सिनेमासाठी मी त्यांचा लास्ट शॉट घेतला आणि त्याच्या दोन दिवसांनंतर त्यांचं निधन झालं."
प्रियदर्शन दिग्दर्शित 'भूत बंगला' १७ एप्रिल रोजी रिलीज होत आहे. यामध्ये असरानी यांची भूमिका आहे. अक्षय कुमार, वामिका गब्बी यांच्यासोबत राजपाल यादव, परेश रावल असे तगडे कॉमेडी स्टार्सही आहेत.