'रामायण'साठी रणबीर कपूरचीच निवड का केली? दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणाले, "प्रभू श्रीराम हे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 09:41 IST2026-04-02T09:40:42+5:302026-04-02T09:41:38+5:30
रणबीर कपूरशिवाय कोणीच साकारु शकणार नाही..., नितेश तिवारी असं का म्हणाले?

'रामायण'साठी रणबीर कपूरचीच निवड का केली? दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणाले, "प्रभू श्रीराम हे..."
रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' सिनेमाचा टीझर आज रिलीज होत आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रणबीर सिनेमात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे तर साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारत आहे. सिनेमाची एकूणच स्टारकास्ट तगडी आहे. नितेश तिवारींनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे तर नमित मल्होत्रांनी निर्मिती केली आहे. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क येथे सिनेमाची पहिली झलक दाखवण्यात आली. तर आज भारतात सिनेमाचा पहिला टीझर रिलीज केला जाणार आहे. या सिनेमासाठी रणबीर कपूरचीच निवड का केली याचं उत्तर नुकतंच नितेश तिवारींनी दिलं.
न्यूयॉर्कमध्ये माध्यमांशी बोलताना नितेश तिवारी म्हणाले, "प्रभू श्रीराम हे मोजकंच बोलणारे व्यक्ती होते. त्यांचं प्रेम हे अमर्याद होतं. त्यांची पीडा दिसू शकत नाही पण जाणवते. त्यांच्या शौर्यासाठी शारिरीक कमालीची शारिरीक ताकद हवी. ही भूमिका खूप आव्हानात्मक होती आणि आम्हाला वाटलं की रणबीर कपूरशिवाय कोणीही दुसरा अभिनेता ती निभावू शकणार नाही."
'रामायण' सिनेमात काहीही मॉडर्न केलेलं नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले, "रामायणाचं सार आपण जपलेल्या मूल्यांमध्ये आहे. ही मूल्ये युनिव्हर्सल आणि कालातीत आहेत. म्हणूनच मला यामध्ये काहीही आधुनिक दाखवायचं नव्हतं. वास्तविक पाहता जगाला त्या मूल्यांचा विसर पडला आहे. याच मूल्यांची आठवण करुन देण्याची वेळ आता आली आहे आणि मला आशा आहे अशा सिनेमांमुळे जग आणखी चांगले बनेल."
आज हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर 'रामायण'चा टीझर रिलीज होत आहे. याला राम असं नाव दिलं गेलं आहे. सिनेमात यश, सनी देओल, लारा दत्ता, अरुण गोविलसह मोठी स्टारकास्ट आहे. सिनेमाचं बजेट, व्हीएफएक्सची जोरदार चर्चा आहे. हॉलिवूडची टीमही सिनेमाशी जोडली गेली आहे. ए आर रहमान आणि हॅन्स झिमर यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. येत्या दिवाळीत सिनेमाचा पहिला भाग रिलीज होणार आहे.