"'धुरंधर २'मधील अर्ध्या शिव्या म्यूट करुन..." दीपक तिजोरीची रोखठोक पोस्ट, संताप व्यक्त करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 08:57 IST2026-03-27T08:53:36+5:302026-03-27T08:57:35+5:30
दीपक तिजोरीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला.

"'धुरंधर २'मधील अर्ध्या शिव्या म्यूट करुन..." दीपक तिजोरीची रोखठोक पोस्ट, संताप व्यक्त करत म्हणाला...
दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई करतोय. आता हा चित्रपट एका नव्या वादात सापडला आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक दीपक तिजोरीनं थिएटर आणि OTT वर्जनमधील फरकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दीपक तिजोरीनं तीव्र शब्दांत सेन्सॉर बोर्डावर निशाणा साधालाय.
दीपक तिजोरीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला. तो म्हणाला, "मान्य करतो की कदाचित मीच काहीतरी चुकवत असेन. कदाचित माझ्याकडे केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC) किंवा त्यांच्या सदस्यांइतकी बुद्धिमत्ता नसेल. कारण मला खरंच हे समजत नाही. शिव्यांचा अर्धा भाग म्यूट का करायचा आणि उरलेला तसाच का ठेवायचा? काही ठिकाणी शब्द ठेवायचे, तर काही पूर्णपणे कापायचे, हे नेमकं कशासाठी?" असा सवाल त्यानं केला.
त्यानं लिहलं, "विशेषतः जेव्हा चित्रपटाला आधीच 18+ सर्टिफिकेट मिळालेलं असतं, म्हणजेच तो प्रौढ प्रेक्षकांसाठीच आहे. मग आपण नेमकं कोणाचं संरक्षण करत आहोत? आणि कशापासून… अर्ध्या शब्दापासून? आणि मग येतो तो भाग जो मला खरंच गोंधळात टाकतो. तोच चित्रपट एक-दोन महिन्यांत OTT वर रिलीज होतो. पूर्णपणे अनम्यूट… कोणताही बदल नाही… जसा मूळ बनवला होता तसाच. आणि तिथेच मुलं तो चित्रपट पाहतात… घरी… कुटुंबासोबत बसून… सगळं स्पष्ट ऐकू येतं. म्हणून मी फक्त प्रामाणिकपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय", असं त्यानं नमूद केलं.
"प्रौढांसाठी थिएटरमध्ये काही गोष्टी 'अर्धवट म्यूट' करणं कितपत योग्य आहे, जेव्हा काही दिवसांनी तीच गोष्ट घरी पूर्ण आवाजात ऐकायला मिळते? कदाचित यामागे काही लॉजिक असेल, जे मला दिसत नाही किंवा कदाचित आपण चुकीच्या गोष्टींचाच जास्त विचार करत आहोत. मी फक्त सिनेमाचं तर्कशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, सीबीएफसीचं तर्कशास्त्र", असं त्यानं पोस्टच्या शेवटी म्हटलं.
'धुरंधर: द रिव्हेंज'ला दिल्या होत्या २१ सूचना
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदर्शनापूर्वी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला २१ सूचना दिल्या होत्या. यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. शिरच्छेद, डोळे काढणे अशी हिंसक दृश्ये दृश्ये कमी करण्यात आली. या कात्रीमुळे भारतीय आवृत्ती आंतरराष्ट्रीय आवृत्तीपेक्षा ६ मिनिटांनी लहान झाली असून चित्रपटाचा एकूण वेळ ३ तास ४९ मिनिटे इतका आहे.
दिग्गज कलाकारांची फौज
३ तास ४९ मिनिटांच्या या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल हे दिग्गज कलाकार पुन्हा एकदा आपल्या दमदार भूमिकांमध्ये दिसत आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर दुसऱ्या भागानेही प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.