ए आर रहमान यांना यायचे आत्महत्येचे विचार, आईच्या एका सल्ल्यामुळे बदललं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 18:02 IST2024-01-11T17:58:05+5:302024-01-11T18:02:14+5:30
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रेहमान यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगावर भाष्य केलं आहे. अशा प्रसंगातून त्यांना बाहेर पडण्यासाठी आईची साथ मोलाची ठरली.

ए आर रहमान यांना यायचे आत्महत्येचे विचार, आईच्या एका सल्ल्यामुळे बदललं आयुष्य
A R Rahman : प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान यांचे भारतीय संगीत क्षेत्रात मोलाचे योगादान आहे. त्यांनी कंपोज केलेल्या गाण्यांची ख्याती जगभर आहे. 'जय हो','ताल','तु ही रे','कहना ही क्या' असे त्यांचे एकापेक्षा एक गाणी आणि अल्बम हिट आहेत. शांत स्वभावाचे ए आर रहमान यांचं कामच बोलून दाखवतं.
ए आर रेहमान यांनी त्यांच्या आयुष्यातील वाईट अनुभवांवर प्रकाश टाकलाय. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ए आर रेहमान यांनी त्यांच्या जीवनातील एक किस्सा सांगितलाय. ऑस्कर विजेत्या या कंपोजरला त्यांच्या संघर्षाच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.या मुलाखतीत त्यांंच्या आयुष्याबद्दल लोकांना माहित नसलेल्या काही गोष्टींवर ते मनमोकळेपणाने बोलले आहेत.
एक वेळ अशी होती जेव्हा ए आर रेहमान यांच्या मनात वारंवार आत्महत्येचे विचार यायचे. वयाच्या पंचविशीत असाताना आत्महत्येच्या विचारांनी त्यांच्या मनात घर केले होते. त्या वेळी रेहमान यांचे त्यांच्या आईने मतपरिवर्तन केले, असा खुलासा त्यांनी मुलाखती दरम्यान केला. २५ वर्षाचा असताना मी स्वत: ला अपयशी समजायचो. त्यामुळे मनात आत्महत्येचे विचार येत असत असे रेहमान यांनी सांगितले. अशा परिस्थितीत ए आर रेहमान यांच्या आईने त्यांचे खच्चीकरण न होऊ देता त्यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांचे मनोबल वाढवण्यात आईची मोलाची साथ त्यांना मिळाली.
आई आणि अध्यात्माच्या मदतीने आत्महत्येच्या विचारातून मी बाहेर आलो. माझी आई म्हणायची, 'जेव्हा तू इतरांसाठी जगशील तेव्हा तुझ्या मनात हे विचार येणार नाहीत.' माझ्या आईकडून मला मिळालेला हा सर्वात सुंदर सल्ला आहे. असे देखील ए आर रेहमान म्हणाले.