Birthday Special : ‘हे’ आहे नसीरुद्दीन शहा यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठे सत्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 11:55 IST2017-07-20T06:25:22+5:302017-07-20T11:55:22+5:30
शेकडो चित्रपटांत आपल्या अतुलनीय अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांचा आज (२० जुलै)वाढदिवस. हिंदी सिनेमामध्ये नसीरुद्दीन ...

Birthday Special : ‘हे’ आहे नसीरुद्दीन शहा यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठे सत्य !
उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये २० जुलै १९६३रोजी नसीरुद्दीन शाह यांचा जन्म झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नसीर यांनी अलीगडच्या विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. अभिनयाचे धडे घेतल्यानंतर नसीर यांनी हिंदी सिनेमाकडे कल वाढवला.
नसीर २० वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी स्वत:पेक्षा १५ वर्षे मोठ्या मनारा सिकरीसोबत लग्न केले. मनारा परवीना मुराद नावाने ओळखली जायची. नसीरने परवीनासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांना घरातून बराच विरोध सहन करावा लागला होता. मनारा १५ वर्षांने मोठी होती. शिवाय विवाहित होती. एवढेच नाही तर एकाची मुलाची आई होती. घरच्यांचा विरोध डावलून नसीर यांनी मनाराशी लग्न केले. लग्नानंतर वर्षभरात दोघांना एक मुलगी झाली. तिचे नाव आहे, हिबा शाह. पण हिबा वर्षभराचीही नव्हती की, नसीर व मनारा यांच्यात वाद सुरु झालेत. ते वेगवेगळे राहू लागले. मात्र निकाहनाम्यातील मेहरची रक्कम देऊ शकत नसल्यामुळे नसीर मनाराला ‘तलाक’ देऊ शकले नाहीत. १९८२ मध्ये नसीर यांनी मेहरची रक्कम गोळा केली आणि नंतर कुठे तिला ‘तलाक’ दिला.
नसीर यांच्यासोबतच्या ‘तलाक’नंतर मनारा मुलीला घेऊन इराणला शिफ्ट झाली होती. माझ्या मुलीसोबत कुठलाही संबंध ठेवायचा नाही, असे तिने नसीर यांना बजावले होते. पण हिबा १८ वर्षांची झाली अन् आपल्या आईला सोडून वडिलांकडे राहायला आली. हिबाने लग्न केलेले नाही. आता ती वडिल, सावत्र आई आणि सावत्र भावंडांसोबत राहते.
मनारासोबत ‘तलाक’ घेतल्यानंतर नसीर यांनी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यादरम्यान अभिनेत्री रत्ना पाठक त्यांच्या आयुष्यात आल्या. रत्ना गुजरातच्या प्रसिध्द अभिनेत्री दीना पाठक यांची मुलगी आहे. गुजरातचे जावई बनलेले नसीर दुस-या लग्नाच्यावेळी एका मुलीचे वडील होते. १९८२ मध्ये दोघांनीही अतिशय साधेपणाने लग्न केले. या दोघांना इमाद व विवान अशी दोन मुले आहेत. दोघांचेही धर्म वेगवेगळे असूनही गेल्या ३४ वर्षांपासून ते एकमेकांसोबत आहेत.
नसीरुद्दीन यांच्याविषयी बोलताना रत्ना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, ‘आमची पहिली भेट नाट्यकार सत्यदेव दुबे नावाच्या ‘संभोग से संन्यास तक’च्या सरावादरम्यान झाली होती. पहिल्या भेटीत आमच्यात एकमेकांप्रति कोणतेही आकर्षण नव्हते. परंतु काही महिने एकत्र काम केल्याने आम्ही जवळ आलो. नसीरुद्दीन शाह आणि रत्ना यांनी लग्न केले तेव्हा नसीरुद्दीन यांना १३ वर्षांची मुलगी होती. रत्ना यांनी एकदा सांगितले होते, की लग्न करून घरी गेल्यानंतर हिबा माझा स्वीकार करेल की नाही यांची थोडी चिंता वाटली. पण रत्ना आणि हिबा यांच्यात आई आणि मुलीचे नाते निर्माण झाले.
थिएटरपासून सुरुवात करणाºया नसीर यांनी ‘निशांत’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या आर्ट फिल्ममध्ये स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्या मुख्य भूमिका होत्या. समांतर आणि व्यावसायिक अशा दोन्ही चित्रपटांमध्ये नसीर यांनी आपला ठसा उमटवला.
‘मिर्झा गालिब’ या दूरदर्शनवरील मालिकेने नसीर यांचे एक अधुरे स्वप्न पूर्ण केले. या मालिकेत नसीर यांनी मिर्झा गालिब यांची भूमिका अशी काही जिवंत केली की, ती प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली. मिर्झा गालिबप्रमाणचे महात्मा गांधी यांची भूमिका साकारण्याच्या सुंदर स्वप्नाने त्यांना पछाडले होते. रिचर्ड एटिनबरो ‘गांधी’ चित्रपट बनवत होते. या चित्रपटासाठी नसीर यांनी आॅडिशनही दिले होते. मात्र नसीरऐवजी गांधींची भूमिका बेन किंग्सले यांना मिळाली. गांधी साकारण्याचे नसीर यांचे स्वप्न यामुळे भंगले. पण नसीर यांनी या स्वप्नाचा पिच्छा सोडला नाही. १९८२ मध्ये ‘गांधी’ रिलीज झाला. यानंतर १८ वर्षांनंतर कमल हासन यांनी ‘हे राम’ हा चित्रपट बनवला. या चित्रपटाने नसीर यांचे स्वप्न पूर्ण झाले. यात त्यांना गांधी साकारण्याची संधी मिळाली. या भूमिकेत नसीर यांनी इतका जीव ओतला की, त्यांच्या इतका मुरब्बी अभिनेता बॉलिवूडमध्ये दुसरा कुणीही नाही, हेच जणू त्यांनी सिद्ध केले.