"'धुरंधर २' पाहायला जाणारे प्रेक्षक मूर्ख..." 'प्रपोगंडा' वादावर अनुपम खेर यांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:46 IST2026-03-31T12:43:43+5:302026-03-31T12:46:39+5:30
'धुरंधर' सिनेमात प्रपोगंडा आहे की नाही? याविषयी अनुपम खेर यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.

"'धुरंधर २' पाहायला जाणारे प्रेक्षक मूर्ख..." 'प्रपोगंडा' वादावर अनुपम खेर यांचं वक्तव्य
Anupam Kher on Dhurandhar 2 : रणवीर सिंगची भूमिका असलेल्या 'धुरंधर २' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. या चित्रपटाने १००० कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. या सिनेमात रणवीर सिंगच्या भूमिकेचं खूप कौतुक होत आहे. आदित्य धरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 'धुरंधर २' पाहून अनेकांनी सिनेमाला प्रपोगंडा म्हटलं. अखेर याविषयी विचारलं असता अभिनेते अनुपम खेर यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिल्ली (IFFD) २०२६ मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना अनुपम खेर म्हणाले, "जे या चित्रपटाला प्रपोगंडा म्हणतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. आपण अशा लोकांवर आपली ऊर्जा वाया घालवू नये. प्रेक्षक इतके मूर्ख नाहीत की ते रात्री १२ वाजताचे शो हाऊसफुल करतील. लोकांना चित्रपट आवडतोय म्हणूनच ते थिएटरमध्ये जात आहेत".
'धुरंधर २' आणि 'द काश्मीर फाईल्स' सारख्या चित्रपटांचे समर्थन करताना अनुपम खेर पुढे म्हणाले, "हा एक व्यवसाय आहे आणि लोकांना त्यातून काहीतरी मिळतंय म्हणूनच ते पैसे खर्च करत आहेत. जे लोक याला केवळ अजेंडा किंवा प्रपोगंडा म्हणतात, त्यांना आपण आता 'रेस्ट इन पीस' (RIP) म्हणायला हवे. अशा लोकांच्या मतांना किंमत देण्याची गरज नाही".
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' लाट
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' मध्ये रणवीर सिंगसोबत संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटातील जबरदस्त ॲक्शन आणि कथेमुळे प्रेक्षक भारावून गेले आहेत. १००० कोटींची कमाई करून या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला आहे.