"ते मला म्हणतात की तुम्ही बोलत का नाही..."अमिताभ बच्चन यांनी केलं मन मोकळं, ब्लॉगमध्ये म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:11 IST2025-05-28T12:05:30+5:302025-05-28T12:11:39+5:30
बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण यावेळी ट्रोलर्सना अप्रत्यक्ष उत्तर दिलंय.

"ते मला म्हणतात की तुम्ही बोलत का नाही..."अमिताभ बच्चन यांनी केलं मन मोकळं, ब्लॉगमध्ये म्हणाले...
Amitabh Bachchan Blog: बॉलिवूडचे 'बिग बी' अमिताभ बच्चनसोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. ते चाहत्यांसोबत जोडलेलं राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. दररोज सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या भावना चाहत्यांसमोर व्यक्त करतात, यासोबतच ते चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील अपडेट्सही सांगतात. यामुळे ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. अनेकदा बिग बी ट्रोलही होतात. आता अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांंनी ट्रोलिंगला अप्रत्यक्षपणे सडेतोड उत्तर दिलंय.
अमिताभ हे आपल्या ब्लॉगद्वारे मन मोकळं करत असतात. आता बिग बींनी त्यांचे वडील आणि महान कवी हरिवंश राय बच्चन यांच्या काही ओळीही शेअर केल्या. त्यांनी लिहिले, "आणि ते मला माझी सही बदलायला सांगतात.. त्यात ठिपके लावू नकोस.. वाकड्या रेषा लावू नकोस.. हे किंवा ते घाल.. इकडे किंवा तिकडे जाऊ नकोस.. इथे बोलू नकोस, तिथे बोलू नकोस.. जेव्हा तुम्ही बोलता, तेव्हा ते म्हणतात की तुम्ही का बोलता.. जेव्हा तुम्ही बोलत नाही, तेव्हा ते म्हणतात की तुम्ही का बोलत नाही".
अमिताभ बच्चन यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत सरकारच्या 'ऑपरेशन सिंदूर'वर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. ते १९ दिवस सतत रिकाम्या पोस्ट पोस्ट करत होते. ज्यासाठी त्यांना प्रचंड ट्रोलही करण्यात आलं होतं. मौन संपल्यानंतर त्यांनी पोस्ट करत पहलगाम हल्ल्यावर दु:ख व्यक्त केलं होतं. तसेच 'ऑपरेशन सिंदूर' आणि सरकारचं कौतुक केलं होतं.
अमिताभ यांचे आगामी चित्रपट
अमिताभ बच्चन याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात शेवटी ते 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांच्याशिवाय प्रभास, दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत होते. आता बिग बी सध्या आपल्या पुढच्या प्रोजेक्टची तयारी करत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते इंडस्ट्रीत काम करत आहेत. वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांचा कामाचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा आहे. सिनेमा, जाहिराती आणि केबीसी शोमधून त्यांची करोडोंची कमाई होत असते.