'दृश्यम ३'वादादरम्यान पहिल्यांदाच स्पॉट झाला अक्षय खन्ना, विगमुळे सोडला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:51 IST2025-12-30T10:51:02+5:302025-12-30T10:51:58+5:30
Akshaye Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना वादात सापडल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला आहे. सध्या 'धुरंधर' चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत असलेल्या अक्षयच्या 'दृश्यम ३' या आगामी चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक होते. मात्र, अक्षयने हा चित्रपट सोडल्याची बातमी आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

'दृश्यम ३'वादादरम्यान पहिल्यांदाच स्पॉट झाला अक्षय खन्ना, विगमुळे सोडला सिनेमा
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना वादात सापडल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला आहे. सध्या 'धुरंधर' चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत असलेल्या अक्षयच्या 'दृश्यम ३' या आगामी चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक होते. मात्र, अक्षयने हा चित्रपट सोडल्याची बातमी आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अक्षयने अचानक चित्रपट सोडल्याचा दावा निर्मात्यांनी केला असून त्याला कायदेशीर नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. या वादादरम्यान अक्षय खन्ना कॅज्युअल लूकमध्ये पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला. डोक्यावर टोपी घातलेल्या अक्षयने अजय देवगणच्या या चित्रपटातून बाहेर पडण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
'दृश्यम ३' चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी 'बॉलिवूड हंगामा'शी बोलताना सांगितले की, "आमचा अक्षय खन्नासोबत करार झाला होता. अनेक वेळा चर्चा केल्यानंतर त्याचे मानधनही निश्चित झाले होते. मात्र, त्याने चित्रपटात विग वापरण्याचा हट्ट धरला. दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी त्याला समजावून सांगितले की, 'दृश्यम ३' हा सीक्वेल असल्याने कथेच्या सातत्यात अडचण येईल आणि विग वापरणे व्यावहारिक ठरणार नाही."
अक्षयने सिनेमातून अचानक घेतली माघार
पाठक पुढे म्हणाले, "सुरुवातीला तो आमचे म्हणणे समजून घेण्यास तयार झाला होता आणि त्याने आपली मागणी मागे घेतली होती. मात्र, त्याच्या आसपासच्या काही लोकांनी त्याला सल्ला दिला की विग घातल्यामुळे तो अधिक स्मार्ट दिसेल. त्यामुळे त्याने पुन्हा तीच मागणी लावून धरली. अभिषेक या विषयावर पुन्हा चर्चा करायला तयार असतानाच अक्षयने अचानक कळवले की त्याला आता या चित्रपटाचा भाग बनायचे नाहीये."
५०० कोटींच्या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली होती
निर्मात्यांनी पुढे सांगितले की, "जेव्हा अक्षयने अलिबागच्या फार्महाऊसवर या चित्रपटाची पटकथा ऐकली, तेव्हा ती त्याला इतकी आवडली की तो म्हणाला होता, 'हा ५०० कोटींचा चित्रपट आहे, मी माझ्या आयुष्यात अशी स्क्रिप्ट ऐकली नाही.' त्याने दिग्दर्शक आणि लेखकाची गळाभेटही घेतली होती. करार झाला, ॲडव्हान्स दिला गेला आणि कपड्यांसाठी डिझायनरलाही पैसे दिले गेले. पण शूटिंग सुरू होण्याच्या अवघ्या १० दिवस आधी त्याने माघार घेतली."
कायदेशीर कारवाईचा बडगा
अक्षयच्या या वर्तणुकीमुळे आपले मोठे नुकसान झाले असल्याचे सांगत कुमार मंगत पाठक म्हणाले, "मी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करत असून त्याला नोटीस पाठवली आहे. त्याने अद्याप उत्तर दिलेले नाही. 'दृश्यम ३' ही कथा 'दृश्यम २' जिथे संपली तिथूनच सुरू होते. मग त्याच्या पात्राचे केस अचानक कसे वाढू शकतात? जगात असे कोणते तंत्रज्ञान आहे का जे मिनिटांत केस वाढवू शकते?" दरम्यान, अक्षय खन्नाच्या जागी आता निर्मात्यांनी जयदीप अहलावतला कास्ट केल्याचे समजते.