रणवीर सिंह नाही तर 'हा' आहे 'धुरंधर'चा आत्मा, आदित्य धरने पोस्ट शेअर करत दिलं श्रेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 15:50 IST2026-04-05T15:50:14+5:302026-04-05T15:50:57+5:30
'धुरंधर'ला मिळणारा प्रतिसाद बघता आदित्य धरने सोशल मीडियावर आभार व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे.

रणवीर सिंह नाही तर 'हा' आहे 'धुरंधर'चा आत्मा, आदित्य धरने पोस्ट शेअर करत दिलं श्रेय
दिग्दर्शक आदित्य धर सध्या प्रेक्षकांचा आवडता दिग्दर्शक बनला आहे. आधी 'उरी' आणि आता 'धुरंधर'मधून त्याने इंडस्ट्रीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'धुरंधर'मुळे अभिनेता रणवीर सिंहचं तर नशीबच पालटलं आहे. दरम्यान आदित्य धरने रणवीर सिंह नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीला 'धुरंधर'चे डोळे आणि आत्मा असं संबोधलं आहे. कोण आहे तो?
'धुरंधर'ला मिळणारा प्रतिसाद बघता आदित्य धरने सोशल मीडियावर आभार व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे. यात त्याने एका व्यक्तीचं कौतुक केलं आहे. तो लिहितो, "ही पोस्ट विकास नवलखासाठी आहे. 'धुरंधर'मागची दृष्टी, विचार आणि आत्मा सर्वकाही तोच आहे. 'धुरंधर'च्या प्रवासात सामील होणारा तो शेवटचा 'एचओडी'. आमचे शूटिंग सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले असताना तो टीममध्ये आला. विकास किती चोखंदळ आहेत हे पाहता, ती वेळ आमच्यासाठी सर्वस्व होती. एका सिनेमॅटोग्राफरला कामावर घेण्यापेक्षा, ती वेळ म्हणजे जणू नियतीनेच योग्य क्षणी टाकलेले पाऊल होते.
स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्याने जे म्हटले होते ते मला अजूनही आठवते - "अशा सिनेमासाठी मी ३० वर्षे वाट पाहिली आहे. मी यासाठी माझे सर्वस्व पणाला लावीन." आणि त्याने आपला शब्द अक्षरश: पाळला. त्यानंतर जे घडले ते केवळ काम नव्हते, तर ती एक भक्ती होती. अशक्य वाटणारे शेड्युल, अनेकदा हाताबाहेर जाणारा गोंधळ आणि एका चित्रपटाच्या वेळेत व खर्चात जणू दोन चित्रपट शूट करणे... या सर्व धावपळीच्या केंद्रस्थानी विकास खंबीरपणे आणि अथकपणे उभे राहिले. चित्रपटाचे संपूर्ण ओझे अक्षरश: आपल्या खांद्यावर वाहत, अमृतसरची रखरखती उष्णता आणि लेहची हाडं गोठवणारी थंडी सोसत, त्यांनी मूळ संकल्पनेला (Vision) कधीही धक्का लागू दिला नाही. पण विकास यांना जे वेगळे ठरवते, ते केवळ त्याचे सोसणे नाही, तर त्याच्या नजरेतला 'आत्मा' आहे.
बारीक तपशिलांची त्याची पारख, लेन्समागची त्याची भावनिक समज आणि एखादा सीन फक्त कसा दिसतो हेच नाही, तर तो कसा 'जाणवतो' हे समजून घेण्याची त्याची क्षमता... यातच त्याचे मोठेपण सामावलेले आहे. 'धुरंधर'मधील प्रत्येक फ्रेम श्वास घेतेय, कारण त्यांनी तिला तशी मुभा दिली. त्यांनी केवळ क्षण टिपले नाहीत, तर त्यांनी त्या क्षणांना जीवन दिले. सेटवर त्यांच्या सूचना कधीच मोठ्या आवाजात नसायच्या, पण त्या नेहमी अचूक असायच्या. नेहमी सत्य असायच्या. आणि नेहमीच चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या असायच्या.
चित्रपट शूट करणारे अनेकजण असतात, पण विकास हा चित्रपट जगले आहेत. आणि तसे करताना त्यांनी 'धुरंधर'ला असे काहीतरी दिले आहे जे कधीही विकत घेता येत नाही... आणि ते म्हणजे चित्रपटाचा 'आत्मा'. तो ज्या प्रकारचा कलाकार आहे आणि या प्रवासात त्याने जो माणुसकीचा ओलावा आणला, त्याबद्दल मला त्याच्याविषयी प्रचंड कृतज्ञता, आदर आणि प्रेम वाटते. या चित्रपटावर त्यांची छाप कायमची कोरली गेली आहे. आणि मला माहित आहे की ही तर फक्त सुरुवात आहे. इथून पुढे आम्ही ज्या कथा एकत्र सांगू, त्या यापेक्षाही पुढे जातील, अधिक चमकतील आणि खऱ्या अर्थाने अजरामर काहीतरी घडवतील.