"आता कुटुंबासोबत पाहता येतील असे सिनेमेच बनत नाहीत...", प्रसिद्ध अभिनेत्याने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 18:01 IST2026-04-09T18:00:37+5:302026-04-09T18:01:25+5:30
अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाला, "माझेही सिनेमे घरचे पाहत नाही..."

"आता कुटुंबासोबत पाहता येतील असे सिनेमेच बनत नाहीत...", प्रसिद्ध अभिनेत्याने व्यक्त केली खंत
अभिनेता अविनाश तिवारी लवकरच 'गिन्नी वेड्स सनी २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी आयोजित कार्यक्रमात अविनाशने बॉलिवूडमधील कौटुंबिक चित्रपटांच्या कमतरतेवर भाष्य केले. सध्याच्या काळात प्रेक्षकांना कुटुंबासोबत पाहता येतील असे सिनेमेच येत नाहीत, अशा सिनेमांची निर्मिती सातत्याने व्हायला हवी, असे मत त्याने व्यक्त केले.
चित्रपटसृष्टीतील या बदलावर बोलताना अविनाश म्हणाला की, "बदलत्या जीवनशैलीमुळे संयुक्त कुटुंबपद्धती नष्ट होत चालली आहे. आजकाल लोक नोकरी-व्यवसायानिमित्त शहरांकडे स्थलांतरित होत आहेत, त्यामुळे कुटुंबापेक्षा मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या व्यतिरिक्त चित्रपटांच्या तिकिटांचे वाढलेले दर आणि केवळ वैयक्तिक आवडीनुसार सिनेमे बनवण्याच्या मानसिकतेमुळे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारे विषय मागे पडत चालले आहेत."
अविनाशने एक रंजक किस्सा सांगताना कबुली दिली की, त्याच्या स्वतःच्या घरातील मुलांनी अद्याप त्याचे सिनेमे पाहिलेले नाहीत. त्याने जेव्हा आपल्या वहिनीला याबद्दल विचारले, तेव्हा तिने स्पष्ट सांगितले की, 'लैला मजनू'मध्ये तो वेडा झाला आहे आणि 'बुलबुल'मध्ये भूत आहे, मग हे सिनेमे मुलांना कसे दाखवणार? यावरून अविनाशला जाणीव झाली की, त्याने आजवर विविध भूमकिा केल्या असल्या तरी त्या लहान मुलांसाठी किंवा कुटुंबाने एकत्र बसून पाहण्यासारख्या नव्हत्या.
कौटुंबिक चित्रपटांच्या व्यावसायिक गणितावर प्रकाश टाकता अविनाश म्हणाला की, त्याने शेवटचा कौटुंबिक चित्रपट २०२३ मध्ये 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' पाहिला होता. चित्रपट निर्माते अनेकदा तिकीट विक्री होत नसल्याची तक्रार करतात, मात्र जर आपण फॅमिली ड्रामा बनवला, तर एकाच वेळी पूर्ण कुटुंबाची सहा तिकिटे विकली जातात. ही साधी गोष्ट निर्मात्यांच्या लक्षात का येत नाही, असा सवालही त्याने या प्रसंगी उपस्थित केला.