आमिर-अरिजीतच्या भेटीमागचे रहस्य उलगडले, बॉलिवूडमध्ये होणार मोठा 'धमाका'? चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 17:31 IST2026-02-03T17:30:32+5:302026-02-03T17:31:40+5:30
आमिर खान अरिजीतच्या कुटुंबासोबतही वेळ घालवत आहे. या भेटीमागचं कारण काय?

आमिर-अरिजीतच्या भेटीमागचे रहस्य उलगडले, बॉलिवूडमध्ये होणार मोठा 'धमाका'? चर्चांना उधाण
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिर खान आणि लोकप्रिय गायक अरिजीत सिंह यांच्या भेटीची सध्या सोशल मीडियापासून चित्रपट वर्तुळापर्यंत जोरदार चर्चा सुरू आहे. अरिजीतने नुकतीच प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना धक्का दिला होता. मात्र त्यानंतर लगेचच आमिर खानने मुंबई ते थेट पश्चिम बंगालमधील जियागंज असा २१०० किलोमीटरचा प्रवास करून अरिजीतच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर ही जोडी नक्की काय 'धमाका' करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आमिर-अरिजीतच्या भेटीमागचं कारण समोर
या महत्त्वाच्या भेटीमागचे मुख्य कारण आता समोर आले असून हे दोन्ही दिग्गज एका नवीन चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खान एका नव्या चित्रपटाची आखणी करत आहे. या चित्रपटासाठी अरिजीत सिंह 'संगीत दिग्दर्शक' म्हणून जबाबदारी सांभाळणार असल्याच्या चर्चा आहेत. सध्या जियागंजमध्ये गाण्यांचे रेकॉर्डिंग आणि चित्रपटाच्या कामाचे नियोजन सुरू असून, अरिजीत आता गायक म्हणून नाही तर पूर्णवेळ संगीतकार म्हणून आपली नवी इनिंग सुरू करण्याची शक्यता आहे.
कामाला व्यावसायिक स्वरूप देत असतानाच आमिर खान अरिजीतच्या कुटुंबासोबतही वेळ घालवत आहे. आमिरने अरिजीतच्या घराच्या छतावर पतंगबाजीचा आनंद लुटला, तसेच तो तिथे बुद्धिबळाच्या खेळातही सर्वांना मात देत आहे. अरिजीतने गायनातून निवृत्ती घेतल्यामुळे निराश झालेल्या चाहत्यांसाठी या नव्या प्रोजेक्टची बातमी मोठा दिलासा देणारी ठरत आहे.
अरिजीतने पार्श्वगायनातून निवृत्ती घेतली आहेच मात्र त्याची काही शेवटची गाणी येत्या काळात रिलीज होणार आहेत. शाहिद कपूरच्या आगामी 'ओ रोमिओ'मध्येही अरिजीतचं गाणं आहे. इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी अरिजीतला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली तर काहींनी त्याला पाठिंबा देत शुभेच्छाही दिल्या आहेत.