"मला गर्व आहे की मी मुस्लिम..." धर्माची खिल्ली उडविल्याच्या आरोपांवर आमिर खानचं उत्तर, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:42 IST2025-06-15T13:40:32+5:302025-06-15T13:42:32+5:30
आमिर खान अलीकडेच 'आप की अदालत' या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाला होता.

"मला गर्व आहे की मी मुस्लिम..." धर्माची खिल्ली उडविल्याच्या आरोपांवर आमिर खानचं उत्तर, म्हणाला...
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'सितारे जमीन पर' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या निमित्तानं तो अलीकडेच 'आप की अदालत' या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याने केवळ आपल्या चित्रपटाविषयीच नव्हे, तर वैयक्तिक जीवन, धर्मावरही मोकळेपणानं भाष्य केलं.
'आप की अदालत' कार्यक्रमाचे सूत्रसंचालक रजत शर्मा यांनी आमिरला मुस्लिम समाजातून होणाऱ्या टीकेविषयी विचारलं. काही लोक म्हणतात, "गजनीपर्यंत ठीक होतं, पण आता आमिर विसरला की तो मुस्लिम आहे." यावर आमिरने हसत उत्तर दिलं, "असे अजिबात नाही. मी मुस्लिम आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, मी भारतीय आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. या दोन्ही गोष्टी त्यांच्या जागी बरोबर आहेत".
'सत्यमेव जयते' या शोबद्दलही आमिरवर आरोप झाले होते की त्याने धर्मातील वाईट गोष्टी दाखवून पैसा कमावला. यावर उत्तर देताना आमिर म्हणाला, "मी त्या शोमधून पैसा कमावला नाही, उलट माझ्या जाहिराती सोडल्या. त्या शोमधून जे मिळत होतं त्याच्या सहा-सातपट मी गमावलं".
'पीके' चित्रपटावरही काही लोकांनी धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप केला होता. यावर आमिर म्हणाला, ठमी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. प्रत्येक धर्माचा आणि धार्मिक लोकांचा मी खूप आदर करतो. 'पीके' चित्रपटाचा हेतू धर्मांचा अपमान नव्हता, तर जे लोक धर्माच्या नावाखाली फसवणूक करतात आणि अंधश्रद्धा पसरवतात, त्यांच्याविरोधात होता. प्रत्येक धर्मात असे काही लोक असतात, त्यांच्यापासून सावध राहणं हा एकमेव उद्देश होता". आमिरच्या मते, "चित्रपट हे समाजाचे आरसे असतात. त्याचा हेतू कधीच कोणत्याही धर्माचा अपमान करणं हा नसतो. वैयक्तिक निवडी आणि त्यांचं धर्मावरचं प्रेम या दोन गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या आहेत आणि समाजाने त्याचा आदर करायला हवा".