"आमिर खानने 'ओ रोमियो'ची कथा बदलली, म्हणून..."; दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:10 IST2026-02-19T12:06:19+5:302026-02-19T12:10:21+5:30
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा 'ओ रोमियो' हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

"आमिर खानने 'ओ रोमियो'ची कथा बदलली, म्हणून..."; दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा मोठा खुलासा
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा 'ओ रोमियो' हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीला 'स्पेशल थँक्स' म्हणून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचे नाव झळकले होते. या चित्रपटात कोणत्याही भूमिकेत नसताना आमिरला हे विशेष श्रेय का देण्यात आले, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता. आता स्वतः विशाल भारद्वाज यांनी एका मुलाखतीत यामागच कारण स्पष्ट केलं आहे.
विशाल भारद्वाज यांनी सांगितले की, आमिर खान केवळ एक उत्तम अभिनेता नाही तर त्याला उत्तम कथेची जाण आहे. जेव्हा चित्रपटाची पटकथा (स्क्रिप्ट) तयार होती, तेव्हा विशाल यांनी ती आमिर खानला ऐकवली होती. आमिरने ती कथा अत्यंत बारकाईने ऐकली आणि त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा बदल सुचवला. आमिरने सुचवले की, चित्रपटातील नायिका जो सूड घेते, तो अधिक ठळकपणे दाखण्यासाठी वकील 'अंजुम अन्सारी' या पात्राची हत्या दाखवणे गरजेचे आहे.
दिग्दर्शकाच्या मते, आमिरची ही सूचना चित्रपटासाठी 'टर्निंग पॉईंट' ठरली. मूळ कथेमध्ये या पात्राची हत्या दाखवण्याचा विचार नव्हता, परंतु आमिरच्या सल्ल्यानुसार हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचा प्रसंग चित्रपटात जोडण्यात आला. या एका प्रसंगामुळे कथेतील हुसैन उस्तराच्या (शाहिद कपूर) मनात आफशाबद्दलचं (तृप्ती डिमरी) प्रेम आणि आदर दोन्ही वाढतो, ज्यामुळे त्यांच्या लव्हस्टोरीला एक वेगळं वळण मिळतं. कथेमधील या भावनिक बदलामुळे चित्रपट अधिक खिळवून ठेवणारा झाला.
विशाल भारद्वाज यांनी कबूल केले की, आमिर खानच्या त्या एका लहानशा सूचनेमुळे संपूर्ण 'ओ रोमियो' चित्रपटाच्या कथेचा सूर बदलला आणि कथा अधिक प्रभावशाली झाली. म्हणूनच, आमिरच्या या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी चित्रपटात त्याचे नाव विशेष आभार मानून समाविष्ट केले आहे. शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.