'छावा' चित्रपट फूट पाडणारा आहे का? ए. आर. रहमान म्हणाले "लोक मूर्ख नाहीत, त्यांना सत्य..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:22 IST2026-01-16T14:52:53+5:302026-01-16T15:22:45+5:30
ए. आर. रहमान यांनी एका मुलाखतीमध्ये 'छावा' चित्रपटावर भाष्य केलंय.

'छावा' चित्रपट फूट पाडणारा आहे का? ए. आर. रहमान म्हणाले "लोक मूर्ख नाहीत, त्यांना सत्य..."
A. R. Rahman On Chhaava Movie : गायक ए. आर. रहमान हे त्यांच्या गाण्यांसाठी लोकप्रिय आहेत. त्यांचा जगभरात चाहतावर्ग आहे. विशेष म्हणजे ए. आर. रहमान फक्त गायक नाहीत, ते संगीतकार आणि गीतकारही आहेत. अशातच ए. आर. रहमान चर्चेत आले आहेत. सध्या ते नितेश तिवारींच्या रामायण चित्रपटात संगीतकार म्हणून काम करत आहेत. या निमित्तानं त्यांनी बीबीसीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये यांनी 'छावा' चित्रपटावर भाष्य केलंय.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनित 'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित आहे. मात्र, या चित्रपटाच्या विषयावरून काही स्तरांतून तो समाजाला 'विभाजित' करणारा असल्याचे बोलले जात आहे. बीबीसी एशियन नेटवर्कचे पत्रकार हारून रशीद यांनी याबद्दल ए. आर. रहमान यांना थेट प्रश्न विचारला, त्यावर रहमान यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
पत्रकार हारून रशीद यांनी विचारले, "तुम्ही 'छावा'च्या साउंडट्रॅकवर खूप अभिमान असल्याचे म्हटले आहे आणि तो खरोखर उत्तम आहे, पण ही एक फूट पाडणारी फिल्म वाटते. यावर तुमचे काय मत आहे?" या प्रश्नाला उत्तर देताना ए. आर. रहमान म्हणाले, "हो, माझ्या मते या चित्रपटात विभाजनाचा वापर करण्यात आला आहे, पण यामागचा मूळ उद्देश शौर्य दाखवण्याचा आहे. मी सुरुवातीला दिग्दर्शकाला विचारलं होतं की, या चित्रपटासाठी तुम्हाला माझीच गरज का आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं की या विषयासाठी त्यांना फक्त मीच हवा होतो".
रहमान यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, प्रेक्षक चित्रपट पाहून आंधळेपणाने प्रभावित होत नाहीत. ते म्हणाले, "मला वाटतं या चित्रपटात खूप काही आहे आणि त्याचा शेवट पाहण्यासारखा आहे. लोक यापेक्षा खूप अधिक समजूतदार आहेत. तुम्हाला वाटतं का की लोक फक्त चित्रपट पाहून प्रभावित होतील? प्रत्येक माणसाच्या आत एक अंतःकरण असतं, जे काय सत्य आहे आणि काय फसवणूक आहे, हे ते ओळखतं. 'छावा' हे सर्वात जास्त पूजनीय पात्रांपैकी एक आहे. ते प्रत्येक मराठाच्या रक्ताप्रमाणे आहे. जेव्हा तुम्ही पाहाता चित्रपट संपतो, तेव्हा काही मुली कविता म्हणतात, ते भावुक करणारं आहे.मला या चित्रपटाला संगित देण्याचं भाग्य मिळालं, याचा मला अभिमान आहे", असं अत्यंत समतोल आणि प्रभावी उत्तर त्यांनी दिलं.