"मी ब्राह्मण शाळेत शिकलो, तिथे...", ए आर रहमान यांची 'रामायण' सिनेमावर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:45 IST2026-01-16T16:44:20+5:302026-01-16T16:45:41+5:30
८ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झाल्याबद्दलही सांगितलं.

"मी ब्राह्मण शाळेत शिकलो, तिथे...", ए आर रहमान यांची 'रामायण' सिनेमावर प्रतिक्रिया
ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रहमान यांचे जगभरात चाहते आहेत. रहमान यांनी नुकतंच एका मुलाखतीत करिअर, वैयक्तिक आयुष्य आणि धार्मिक विश्वास यावर चर्चा केली. सध्या रहमान हे नितेश तिवारींच्या आगामी बहुप्रतिक्षित 'रामायण' सिनेमासाठी संगीत देत आहेत. या प्रोजेक्टसाठी ते हॉलिवूड संगीतकार हॅन्स झिमरसोबत काम करत आहेत. यादरम्यान त्यांनी ८ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झाल्याबद्दल सांगितलं. इंडस्ट्रीतील राजकारणाचा त्यांनाही फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं.
बीबीसी एशियन चॅनलशी बोलताना ए आर रहमान यांनी 'रामायण'सिनेमानिमित्त चर्चा केली. ते म्हणाले, "मी ब्राह्मण शाळेत शिकलो आहे. दरवर्षी आम्हाला महाभारत आणि रामायणमधील गोष्टी शिकवल्या जायच्या. त्यामुळे मला कथा माहित आहे. ही गोष्ट प्रामाणिकपणा, आदर्श यावर आधारित आहे. लोकांमध्ये मतमतांतर असू शकतं पण मी चांगल्या गोष्टींना महत्व देतो मग आपण या चांगल्या गोष्टी नक्की कुठून शिकतोय हे महत्वाचं नाही."
ते पुढे म्हणाले, "पैगंबर यांनी सांगितलं आहे की ज्ञान हे अनमोल आहे मग ते राजाने दिलेलं असो किंवा भिकारीने, चांगल्या कामातून असो किंवा वाईट कामातून असो. त्यामुळे ज्ञान घेण्यापासून दूर जाऊ नका. जिथे मिळतंय तिथून घ्या. आपण स्वार्थ सोडून द्यायला हवा. मी या प्रोजेक्टवर काम करतोय याचा मला अभिमान वाटतो. कारण भारताची ही पौराणिक कथा जगभरात पोहोचत आहे. हॅन्स झिमर यहूदी आहे, मी मुसलमान आहे आणि आम्ही दोघं हिंदू ग्रंथासाठी काम करतोय."
तमिळ लोकांसोबत इंडस्ट्रीत भेदभाव होतो का? यावर ए आरहमान म्हणाले, "मा थेट असं जाणवलं तर नाही. कदाचित छुप्या पद्धतीने होत असेल. मात्र गेल्या ८ वर्षांपासून पॉवर बदलली आहे आणि आता क्रिएटिव्ह लोक नाही उलट दुसरेच लोक आता निर्णय घेत आहेत. माझ्यासमोर थेट असं घडलं नाही. मला फक्त कानोकान अशी खबर लागते की मला एका प्रोजेक्टसाठी बुक केलं होतं पण म्युझिक कंपनीने त्यांच्या पाच कंपोजर्सना ठेवलं.मी कामामागे धावत नाही. माझं काम पाहून मला पुढचं काम मिळायला पाहिजे असं मला वाटतं. मी ज्यासाठी पात्र आहे ते मला मिळतं."