धर्मेंद्र यांच्या निधनानंतर मध्यरात्री अमिताभ बच्चन यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाले- "तुमच्या मागे आता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:12 IST2025-11-25T09:10:09+5:302025-11-25T09:12:26+5:30
वीरुच्या निधनानंतर जयच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. अमिताभ बच्चन यांची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर मध्यरात्री अमिताभ बच्चन यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाले- "तुमच्या मागे आता..."
बॉलिवूडचे 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत 'शोले' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्यासोबत काम केलेले आणि त्यांचे जवळचे मित्र असलेले अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'तुमच्या मागे एक असह्य शांतता'
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली श्रद्धांजली व्यक्त करताना लिहिले, "आणखी एक धाडसी आणि पराक्रमी व्यक्तिमत्व आपल्याला सोडून गेला आहे... तो या रणभूमीतून निघून गेला आहे. मागे एक शांतता सोडून गेला आहे. या शांततेचा आवाज असह्य आहे... धरम जी."
धर्मेंद्र यांचे वर्णन करताना अमिताभ बच्चन पुढे म्हणतात, "ते महानतेचे प्रतीक होते. त्यांची ओळख केवळ त्यांच्या मजबूत आणि प्रभावी शारीरिक व्यक्तिमत्वामुळे नव्हती, तर त्यांच्या दिलदार स्वभावामुळे आणि त्यांच्या साधेपणामुळेही ते ओळखले जायचे.. ते आपल्यासोबत पंजाबमधील त्या गावाच्या मातीचा सुगंध घेऊन आले होते, जिथून ते आले होते. त्यांनी त्या मातीशी असलेलं नातं शेवटपर्यंत जपलं.''
T 5575 -
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 24, 2025
... another valiant Giant has left us .. left the arena .. leaving behind a silence with an unbearable sound ..
Dharam ji .. 🙏 🙏🙏
.. the epitome of greatness, ever linked not only for his renowned physical presence, but for the largeness of his heart , and its…
''ज्या चित्रपटसृष्टीने प्रत्येक दशकात मोठे बदल पाहिले, त्या इंडस्ट्रीत त्यांच्या शानदार कारकिर्दीत त्यांच्यावर कोणताही डाग लागला नाही. चित्रपट उद्योग बदलला, पण धर्मेंद्र यांच्यात कोणताही बदल झाला नाही. त्यांचे स्मितहास्य, त्यांचा आपलेपणा या त्यांच्या गुणांमुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर त्याचा प्रभाव पडायचा. या व्यवसायात हे फार कमी पाहायला मिळते."
''धर्मेंद्र यांच्या जाण्याने हवेमध्ये एकाकीपण भासते आहे. ही पोकळी नेहमीच राहणार'', असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना केली. अशाप्रकारे रात्री उशीरा अमिताभ यांनी भावुक पोस्ट लिहित मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.