पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:47 IST2025-06-07T12:46:17+5:302025-06-07T12:47:05+5:30
"आज मी मुलाला भेटते तेव्हा...", काय म्हणाली अभिनेत्री?

पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
मराठीतील गेल्या काही काळातील सर्वात गाजलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. पाच वर्ष या मालिकेने सर्वांचं मनोरंजन केलं. मालिकेतील सर्वच पात्र गाजली. मालिकेत पहिले अडीच वर्ष दिसलेली अभिनेत्री सीमा घोगळे (Seema Ghogale) सध्या चर्चेत आहे. सीमा घोगळे अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. 'बॉस माझी लाडाची', 'पिरतीचा वणवा उरी पेटला', 'खुलता कळी खुलेना' या मालिकांमध्ये ती दिसली आहे. सीमाने खऱ्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला आहे. आईवडिलांचं निधन, घटस्फोट, नवऱ्याकडे मुलाची कस्टडी या गोष्टींविषयी ती नुकतीच एका मुलाखतीत व्यक्त झाली आहे.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सीमा घोगळे म्हणाली, "आईबाबा गेल्यानंतर माझ्या मागे संजय मोने आणि सुकन्या मोने खंबीरपणे उभे राहिले. मला काहीही अडचण असेल तेव्हा मी त्यांच्याकडे जाते. आईवडील गेल्यानंतर माझ्या सख्ख्या बहिणी माझ्यापासून दुरावल्या. वडील गेल्यानंतर आई असेपर्यंत घर कोणाच्या नावावर करायचं, आई कुणाकडे असणार एवढंच बोलण्यापुरता आम्हा बहिणींचा संपर्क होता. आई गेल्यानंतर आता आम्ही तिघी बहिणी एकमेकांपासून दुरावलो. आम्ही एकमेकींशी बोलतही नाही. कोण कुठे राहतंय कोणाला काही माहित नाही. अशा वेळी मला मानसिक पाठबळ देणारे, माझ्यामागेर घर म्हणून उभं राहणारे संजय मोने आणि सुकन्या मोने आहेत. माझ्या प्रत्येक निर्णयात ते माझ्याबरोबर आहेत.
ती पुढे म्हणाली, "२०१८ ला वडील गेले, २०१९ ला माझा घटस्फोट झाला आणि २०२० ला आई गेली. ही तीन वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होती. माझ्या घटस्फोटाविषयी कळल्यानंतर अनेकांनी मला मदतीचा हात पुढे केला. पण मला सहानुभूती नको होती. माझ्या आयुष्यात आता संजय मोने, सुकन्या मोने आणि माझा मुलगी ही तीन महत्वाची माणसं आहेत. माझआ मुलगा आज मला एक अभिनेत्री म्हणून, आईने स्वत:चं घर घेतलं, आई स्वत:च्या पायावर उभी आहे म्हणून मला मानतो. माझ्या मुलाची कस्टडी माझ्याकडे नाही. याचं कारण तेच मी कलाकार आहे, माझ्या कामाच्या वेळा ठरलेल्या नाहीत. ठरलेला पगार नाही. मी नसताना त्याला पाळणा घरात ठेवणं आलं असतं. त्यापेक्षा तो त्याच्या आजीआजोबांकडे आहे. त्याच्यावर चांगले संस्कार होत आहे. तसंच ते लोक आर्थिकदृष्ट्या चांगले आहेत त्यामुळे त्याला हवं ते तिथे मिळतंय. मी त्याला देऊ शकले असते पण मला निर्बंध येतात. हा निर्णय घेणं त्रासदायक होता. पण सुकन्या मोनेंनी मला समजावलं की तू त्याला वेळ देऊ शकणार नाहीस तर तू हा निर्णय घे. सुट्टीच्या दिवशी मी त्याला भेटते. सुकन्या ताई म्हणाली, फार फार काय होईल लोक म्हणतील किती वाईट आहे. म्हणू दे ना. तुला माहितीये तू काय आहेस. मग विषय संपला."