गौतम गंभीरच्या रणनीतीने KKR चे नशीब पालटले; वाचा किंग खानच्या संघाचे ग्रह कसे बदलले

Gautam Gambhir KKR: गौतम गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने दोनवेळा आयपीएल जिंकण्याची किमया साधली.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा दबदबा कायम आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामीतील सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकून केकेआरने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा केकेआरच्या संघात बराचसा बदल झाला आहे.

कर्णधार अय्यरची एन्ट्री झाली असून माजी खेळाडू गौतम गंभीर पुन्हा एकदा फ्रँचायझीसोबत जोडला गेला आहे. केकेआरच्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आता गंभीरवर आहे. तो मागील दोन हंगाम लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक होता.

गंभीरच्याच नेतृत्वात केकेआरने दोनवेळा आयपीएल जिंकण्याची किमया साधली. मागील काही हंगामांपासून केकेआरच्या संघाची गाडी विजयाच्या पटरीवरून घसरली आहे. ती गाडी पुन्हा एकदा रूळावर आणण्याची जबाबदारी श्रेयस अय्यरसह गंभीरवर आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात जोरदार करण्यात गंभीर अँड कंपनीला यश आले.

२०१२ आणि २०१४ मध्ये केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वात आयपीएलचा किताब जिंकला होता. यंदा केकेआरचा संघ चांगल्या लयनुसार खेळत असून, याचे श्रेय कर्णधार श्रेयस अय्यरसह गौतम गंभीरला देखील द्यावे लागेल.

केकेआरचा सलामीवीर सुनील नरेन पेशाने एक फिरकीपटू आहे. पण, आयपीएलमध्ये स्फोटक खेळी करून त्याने त्याची वेगळी ओळख निर्माण केली. मागील काही वर्षांपासून तो खालच्या फळीत फलंदाजी करत होता. पण, यंदा पुन्हा एकदा तो सलामीवीर फलंदाज म्हणून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना घाम फोडत आहे.

नरेनने केकेआरसाठी सलामीवीर म्हणून ४३ सामन्यांत ८६३ धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात गंभीरची केकेआरच्या संघात एन्ट्री झाली आहे. गंभीर येताच नरेनला पुन्हा एकदा सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळत असून तो या संधीचा चांगलाच फायदा घेत आहे. त्याने ३ सामन्यांत १३४ धावा कुटल्या.

गौतम गंभीरसह केकेआरच्या संघ व्यवस्थापनाने अनुभवी खेळाडूंना वगळून बऱ्यापैकी युवा खेळाडूंना खेळवण्याचा निर्णय घेतला. मनीष पांडे आणि केएस भरत हे केकेआरचा भाग असले तरी ते अद्याप बाकावर आहेत. पण, अंगकृश रघुवंशी, रमनदीप सिंग आणि वैभव अरोडा यांसारख्या युवा शिलेदारांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले.

याशिवाय गंभीरने आंद्रे रसेलला खुली सूट दिली असून त्याचा फायदा संघाला होताना दिसत आहे. मागील काही हंगामांमध्ये रसेलची बॅट शांत होती. पण, यंदा तो झंझावाती खेळी करत असून केकेआरसाठी उत्कृष्ट फिनिशरची भूमिका बजावत आहे. त्याने आतापर्यंत १०५ धावा केल्या असून ५ बळी घेतले आहेत.

आयपीएल २०२४ ला सुरुवात होण्याआधीच संघाचा स्फोटक सलामीवीर जेसन रॉयने स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले होते. त्याच्या जागी फिलिप साल्टला केकेआरच्या संघात संधी मिळाली.

साल्ट दमदार कामगिरी करून संघाला चांगली सुरुवात करून देत आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगण्याआधीपासून गंभीरने एका चांगल्या मार्गदर्शकाची भूमिका बजावली. तो सामना सुरू असताना देखील गुरूमंत्र देऊन खेळाडूंचे मनोबल वाढवताना दिसतो.