विराट कोहलीच्या समर्थनार्थ अख्तरसोबत 'दादा'गिरी; गांगुलीने शोएबला दिले चोख प्रत्युत्तर

आपल्या विधानांमुळं नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आहे.

आपल्या विधानांमुळं नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्यानं भारतीय खेळाडू विराट कोहलीबद्दल केलेली टिप्पणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलींना खटकली.

अख्तरने म्हटलं होतं की, जर विराट कोहलीला सचिन तेंडुलकरचा १०० शतकांचा विक्रम मोडायचा असेल तर त्यानं वन डे आणि ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त व्हायला हवं आणि फक्त कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करावं.

पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं दिलेल्या सल्ल्याबद्दल गांगुलींना विचारलं असता त्यांनी शोएब अख्तरला चोख प्रत्युत्तर दिलं. विराट कोहलीला अनेकदा सल्ले देणाऱ्या शोएब अख्तरने पुन्हा एकदा किंग कोहलीला भन्नाट सल्ला दिला आहे.

एका कार्यक्रमात सौरव गांगुलींना शोएब अख्तरच्या या प्रतिक्रियेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना सौरव गांगुलींनी अख्तरची बोलती बंद केली.

"विराट कोहलीला खेळायचं असेल तर त्यानं खेळावं. तो प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करतो", अशा शब्दांत गांगुलींनी अख्तरच्या विधानाची फिरकी घेतली.

शोएब अख्तर त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. क्रिकेटला रामराम करून बराच काळ लोटला असला तरी अख्तर विद्यमान घडामोडींवर भाष्य करत असतो.

विराट कोहलीला सल्ला देताना अख्तरने इतरही बाबींवर भाष्य केले. एका भारतीय क्रीडा पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत त्यानं पाकिस्तान क्रिकेटबद्दल भाष्य केले. पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या पैशावर जगत असल्याचे परखड मत अख्तरनं मांडलं.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआय आणि इतर बोर्डांकडून आयसीसीकडे येणारा पैसा महसूल वाटणीअंतर्गत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पाठवला जातो. पाकिस्तानातील देशांतर्गत क्रिकेटपटूंना त्या पैशांच्या जोरावरच मॅच फी मिळते, असे अख्तरनं नमूद केलं.

शोएब अख्तरने सांगितलं की, २०२३ च्या विश्वचषकात एक वेगळीच मजा येणार आहे. कारण आता ५० षटकांच्या क्रिकेटचे भविष्य दिसत नाही. या विश्वचषकातून भारताने भरपूर कमाई करावी अशी माझी इच्छा आहे. हे सांगायला अनेकांना संकोच वाटेल. पण मी स्पष्टपणे सांगतो की भारताचा महसूल आयसीसीला जातो. त्याचा वाटा पाकिस्तानातही येतो आणि त्यातून आमच्या देशांतर्गत क्रिकेटपटूंना मॅच फी मिळते.

एकूणच भारतातून येणाऱ्या पैशातून पाकिस्तानातील युवा क्रिकेटपटूंचे पालनपोषण होत असल्याचे अख्तरने स्पष्ट केलं.