इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत पहिल्या पाच सामन्यात विकेटची पाटी कोरी राहिलेल्या जसप्रीत बुमराह गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २०० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला त्याने पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का दिला. यंदाच्या हंगामाती जसप्रीत बुमराहची ही पहिली विकेट ठरली. दुसऱ्या बाजूला साई सुदर्शनवर गोल्डन डकची नामुष्की ओढावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराहला पहिली विकेट मिळताच हार्दिक पांड्या ट्रोल, कारण...
पहिल्या पाच सामन्यात विकेटसाठी संघर्ष करणाऱ्या जसप्रीत बुमराहटला विकेट मिळाल्याचा जल्लोष फक्त MI च्या ताफ्यातच झाला नाही. सोशल मीडियावरही या विकेट्सचा आनंद साजरा करण्यात आला. यादरम्यान काही नेटकऱ्यांनी अप्रत्यक्षरित्या हार्दिक पांड्यावर निशाणा साधला आहे. कोणताही कर्णधार जसप्रीत बुमराह संघात असताना त्यालाच पहिले षटक देईल. पण हार्दिक पांड्याने तसे केले नाही. त्यामुळेच बुमराह अजूनपर्यंत विकेट लेस राहिला अशा आशयाच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटल्याचे पाहायला मिळाले.
पण तुम्हाला माहितीये का? IPL मध्ये फार कमी वेळा बुमराहनं टाकलीये पहिली ओव्हर
जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनला बाद केले. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच त्याने पहिले षटक टाकले. कारण याआधी ट्रेंट बोल्ट नवीन चेंडूने गोलंदाजी करत होता. दुसऱ्या बाजूनं हार्दिक पांड्या किंवा दीपक चहर गोलंदाजी करताना पाहायला मिळाले होते. हा गेम प्लॅन बदलला अन् जसप्रीत बुमराह पुन्हा फॉर्ममध्ये परतला. हार्दिक पांड्याला शहाणपण सुचलं ते MI साठी फायदाचं ठरले, असे चित्र निर्माण झाले. पण तुम्हाला माहितीये का? पांड्या नेतृत्वाखालीच नव्हे तर याआधीही IPL मध्ये बुमराह फार कमी वेळा पहिले षटक टाकताना दिसला आहे. गुजरात विरुद्ध जसप्रीत बुमराहने सातव्यांदा डावातील पहिले षटक टाकले. याआधी २०१४ मध्ये दोनदा, २०१८ मध्ये तीनदा आणि २०२२ मध्ये एकदा त्याने मुंबई इंडियन्सच्या संघाकडून पहिले षटक टाकल्याचे पाहायला मिळाले आहे.
साई सुदर्शन दुसऱ्यांदा ठरला फिका
आयपीएलमध्ये साई सुदर्शन आणि बुमराह आतापर्यंत तीन वेळा समोरासमोर आले आहेत. बुमराहच्या १८ चेंडूत साईनं १७ धावा केल्या असून दुसऱ्यांदा त्याने बुमराहसमोर विकेट गमावल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्याआधी जसप्रीत बुमराहनं टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पण आयपीएलच्या मोहिमेला सुरुवात केल्यावर त्याची धार कमी झाली. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनंही त्याची धुलाई केली. विकेटची हमी असणारा गोलंदाज कमी पडल्यामुळे MI लाही त्याचा मोठा फटका बसला.