शहर विकासाच्या मुद्द्यांवर उद्धवसेनेने दिला थेट भाजपाला प्रस्ताव; भाजपा-उद्धवसेना युती होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:49 IST2026-01-22T11:48:47+5:302026-01-22T11:49:19+5:30
आमचा प्रस्ताव मान्य असेल तर भाजपाने आमच्याशी चर्चा करावी, उद्धवसेनेच्या आमदाराची माहिती

शहर विकासाच्या मुद्द्यांवर उद्धवसेनेने दिला थेट भाजपाला प्रस्ताव; भाजपा-उद्धवसेना युती होणार?
अकोला - शहर विकासाच्या मुद्द्यांवर काही नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क साधल्याचा दावा भारतीय जनता पक्षाकडून केला जात असला तरी तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. भाजपाने खरेच शहराचा विकास केला असता तर त्यांच्या नगरसेवकांची संख्या ४८ वरून ३८ वर आली नसती अशी टीका उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी करत सत्ता समीकरणात भाजपाला प्रस्ताव दिल्याचं सांगितले आहे. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी नितीन देशमुख म्हणाले की, भाजपाचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यांना आम्ही शहर विकासाचा प्रस्ताव दिला आहे. तो मान्य असेल तर आम्ही भाजपाच्या सोबत जाऊ, अन्यथा काँग्रेससोबत जाऊ असे आमदार देशमुख यांनी सांगितले. अकोला महापालिकेत पक्षाचे सर्व सहा नगरसेवक उद्धवसेनेसोबतच आहेत असं त्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय भाजपा नेत्यांकडून चुकीच्या पद्धतीने प्रसार करून उद्धवसेनेचे नगरसेवक संपर्कात असल्याचं वक्तव्य केले जात आहे. माजी महापौर विजय अग्रवाल यांचा फोन आला होता. त्यांना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्याशी चर्चा करण्यास सांगितली. या चर्चेत आम्ही शहराच्या विकासाचे मुद्दे मांडले. आम्हाला पदांची अपेक्षा नसून शहराच्या खऱ्या अर्थाने विकास व्हावा हीच आमची भूमिका आहे असं त्यांनी म्हटलं.
या मुद्द्यांच्या आधारे दिला प्रस्ताव
शहरात बससेवा सुरू करावी, हद्दवाढीसाठी १५० कोटी रुपयांचा प्रलंबित निधी द्यावा, आतापर्यंत आलेले १०० कोटी रुपये नेमके कुठे खर्च झाले याची चौकशी व्हावी, मालमत्ता कर कमी करावा, हद्दवाढ भागात नियमित पाणीपुरवठा करावा, जिगाव प्रकल्पाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने शहराला वान धरणातून एक दिवसाआड शुद्ध पाणीपुरवठा करावा, झोननिहाय हॉस्पिटल असावीत, रस्त्यांचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी ठाम भूमिका उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख दातकर यांनी माजी महापौर विजय अग्रवाल यांच्याशी चर्चा करताना मांडल्याची माहितीही आमदार देशमुखांनी दिली.
दरम्यान, उद्धवसेनेने दिलेल्या प्रस्तावावर अद्याप भाजपाकडून कुठलेही स्पष्टीकरण आले नाही. याउलट उद्धवसेनेचे नगरसेवक संपर्कात असल्याचे चुकीचे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आमदार नितीन देशमुखांनी केला. मात्र आमचा प्रस्ताव मान्य असेल तर भाजपाने आमच्याशी चर्चा करावी अन्यथा आम्ही विरोधी बाकांवर बसून जनतेसाठी संघर्ष करू. चर्चा न करताच कुठलीही बाबी माध्यमांपुढे मांडू नये असा सल्लाही उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजपा नेत्यांना दिला.