फळं आणि भाज्या खाल्ल्याने आजार दूर राहतात असं आतापर्यंत आपण ऐकत आलो आहोत. परंतु नुकत्याच 'युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्निया' (USC) ने केलेल्या एका रिसर्चने या गोष्टीला मोठा धक्का दिला आहे. या रिसर्चमध्ये असे संकेत मिळाले आहेत की, ज्या तरुणांनी कधीही धूम्रपान केलेलं नाही, त्यांच्यात लंग कॅन्सरचा धोका वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे याचा संबंध त्यांच्या 'हेल्दी डाएट'शी जोडला जात आहे. हा रिसर्च 'अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्च'च्या २०२६ च्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आला आहे.
भाजी नाही, कीटकनाशकं आहेत खरे शत्रू
वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, फळं किंवा भाज्यांमुळे त्रास होत नाही. खरे शत्रू 'पेस्टिसाईड्स' (कीटकनाशकं) आहेत, जी पिकं उगवण्यासाठी वापरली जातात. रिसर्चनुसार, पारंपारिक पद्धतीने पिकवलेल्या पिकांवर या केमिकल्सचे अवशेष शिल्लक राहतात. जेव्हा आपण या 'आरोग्यदायी' गोष्टींचं सेवन करतो, तेव्हा ही कीटकनाशकं आपल्या शरीरात जाऊन कॅन्सरच्या पेशी सक्रिय करू शकतात. विशेषतः कडधान्य आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये यांचा प्रभाव अधिक दिसून आला आहे.
रिपोर्टमध्ये काय आहे?
या रिसर्चमध्ये अशा १८७ रुग्णांचा आहार आणि जीवनशैलीचं विश्लेषण करण्यात आलं, ज्यांना ५० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयात लंग कॅन्सर झाला होता. 'हेल्दी ईटिंग इंडेक्स'चा वापर करण्यात आला. यात असं दिसून आलं की, कॅन्सरने ग्रस्त असलेल्या तरुणांचा डाएट स्कोअर ६५ होता, जो सरासरी अमेरिकन स्कोअरपेक्षा (५७) खूप जास्त आहे. याचा अर्थ असा की, हे रुग्ण सामान्य लोकांच्या तुलनेत कितीतरी पतीने जास्त आरोग्यदायी अन्न खात होते.
महिलांना जास्त धोका
या रिसर्चमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे ती म्हणजे, महिलांना याचा धोका जास्त असल्याचं दिसून आलं आहे. रिसर्चमध्ये सामील असलेल्या महिलांचा डाएट स्कोअर खूप जास्त होता, म्हणजेच त्या मोठ्या प्रमाणात हिरव्या भाज्या आणि फळांचं सेवन करत होत्या. तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की, जे लोक धूम्रपान करत नाहीत आणि चांगला आहार घेतात, त्यांना कॅन्सर का होत आहे? हवेतील प्रदूषण आणि अन्नातील केमिकल्स मिळून शरीरावर हल्ला करत आहेत का?
सावध राहणं हाच उपाय
संशोधकांनी असंही म्हटलं आहे की, या सर्वेक्षणात सहभागी झालेले लोक सेल्फ सिलेक्टेड होते, ज्यामुळे निकालांमध्ये थोडा फरक असू शकतो. परंतु, हा डेटा कीटकनाशकांच्या धोक्याकडे नक्कीच लक्ष वेधतो. गेल्या रिसर्चमध्ये वायू प्रदूषण आणि हार्मोन्स संतुलन बिघडवणारे केमिकल्स देखील कॅन्सरचं कारण असल्याचं सांगितलं गेलं होतं. आता यामध्ये अन्नाद्वारे शरीरात पोहोचणाऱ्या कीटकनाशकांचं नावही जोडलं गेलं आहे. अशा परिस्थितीत 'ऑरॅगॅनिक' उत्पादनांची निवड करणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
