कधी कधी जेवण व्यवस्थित बनलेलं असतानाही 'मीठ कमी आहे' असं सतत वाटतं, किंवा प्रत्येक घासात अजून थोडं मीठ हवं असं मन सांगत राहतं. (No matter how much salt you add, food still tastes bland? Craving salt may signal these health risks)काही जणांना तर जेवण कायमच अळणी वाटतं. ही केवळ चवीची सवय नसून, त्यामागे काही शारीरिक आणि मानसिक कारणंही दडलेली असू शकतात.
सर्वात सामान्य कारण म्हणजे जास्त मीठ खाण्याची सवय. जर रोजच्या आहारात लोणचं, पापड, चिप्स, रेडीमेड पदार्थ किंवा फास्ट फूड जास्त प्रमाणात असेल, तर जिभेला जास्त खारट चवीची सवय लागते. त्यामुळे नैसर्गिक चवीचं अन्न अळणी वाटू लागतं. ही सवय हळूहळू बदलावी लागते, कारण जिभेची चवही वेळेनुसार बदलू शकते.
दुसरं कारण म्हणजे शरीरातील काही खनिजांचा असमतोल. कधी कधी शरीरात सोडियम किंवा इतर इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्यास मीठ खायची इच्छा वाढू शकते. खूप घाम येणं, उष्ण हवामान किंवा पुरेसं पाणी न पिणं यामुळेही शरीराला मीठाची गरज जाणवते आणि त्यामुळे जेवण अळणी वाटतं.
तिसरं कारण म्हणजे थकवा आणि ताण. मानसिक ताण वाढला की शरीर काही विशिष्ट चवीकडे आकर्षित होतं, त्यात खारट पदार्थांचाही समावेश असतो. थकलेलं शरीर पटकन ऊर्जा देणाऱ्या चवीकडे वळतं, आणि मीठ त्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.
काही वेळा आरोग्याशी संबंधित कारणंही यामागे असू शकतात. हार्मोन्समधील बदल, झोपेचा अभाव किंवा काही औषधांचा परिणाम यामुळेही चव बदलू शकते. त्यामुळे सतत खूपच मीठ खायची इच्छा होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. ब्लड प्रेशर, शुगर आदी अनेक त्रासांचा संबंध मीठाशी जोडता येतो. शरीराला गरजेपेक्षा जास्त मीठ हवंसं वाटणं हे एक लक्षण आहे. त्यामुळे तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करणं फार गरजेचं आहे.
यावर उपाय म्हणून आहारात संतुलन ठेवणं खूप गरजेचं आहे. हळूहळू मीठाचं प्रमाण कमी करणं, ताजं आणि घरगुती अन्न खाणं, पुरेसं पाणी पिणं आणि शरीराला विश्रांती देणं यामुळे चवीची सवय सुधारू शकते. तसेच लिंबू, कोथिंबीर, मसाले यांचा वापर करून अन्नाची चव वाढवता येते, ज्यामुळे जास्त मीठाची गरज भासत नाही.
