संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांची पाच दिवसांत दोन हजार ७२३ वाहनांवर कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: May 6, 2020 07:33 PM2020-05-06T19:33:45+5:302020-05-06T19:57:37+5:30
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांकडून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हयातील पाचही विभागांमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोन हजार ७२३ वाहन चालकांवर गेल्या पाच दिवसांमध्ये कारवाई करुन त्यांच्याकडून सुमारे दहा लाखांचा दंडही वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभरातील विविध भागांमध्ये विनाकारण वाहनांमधून फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये अशा दोन हजार ७२३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दहा लाख १९ हजार २०० रुपयांचा दंडही वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील मुरबाड, गणेशपूरी, शहापूर, मीरा रोड आणि भार्इंदर या पाच विभागांमधील विविध ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कोरोना - या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून सुमारे २७ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्यासह पाचही विभागांचे पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नाका तपासणीवर नजर ठेवली जात आहे. प्रसंगी गर्दीच्या ठिकाणी ड्रोन कॅमेºयांचीही मदत घेतली जात आहे. १ ते ४ मे या चार दिवसांच्या काळात या सर्वच भागांमधून विनाकारण फिरणाºया एक हजार ९९१ चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करुन त्यांच्याकडून सात लाख ४३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. तर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३४१ आरोपींविरुद्ध ५१ गुन्हे दाखल करण्यात येऊन १४ वाहने जप्त करण्यात आली. दरम्यान, ५ मे रोजी एकाच दिवसामध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाºया ७३२वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लाख ७५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. तर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी २४ आरोपींविरुद्ध चार गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांचीही आठ वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई यापुढेही अशीच सुरु राहणार असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अन्यथा साथ प्रतिबंधक कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.