INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 01:50 PM2024-04-30T13:50:03+5:302024-04-30T13:57:42+5:30

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीत भाजपानं अबकी बार ४०० पार ची घोषणा दिली आहे. परंतु प्रत्यक्षात इंडिया आघाडीच्या आक्रमक प्रचारामुळे भाजपाच्या या घोषणेला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व भाजपा नेते प्रचारात गुंतले आहेत. दुसरीकडे भाजपाविरोधी इंडिया आघाडी आता आक्रमक होताना दिसतेय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जवाहरलाल नेहरूंनंतर सर्वाधिक काळ पंतप्रधान बनण्याची संधी मोदींकडे आहे. भाजपाने अबकी बार ४०० पार यासाठी मेहनत घेतली आहे

परंतु पहिल्या २ टप्प्यातील मतदानानंतर भाजपा जास्त आशावादी दिसत नाही. भाजपाने या निवडणुकीत ४३२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. अजूनही १० जागांवर निर्णय बाकी आहे. भाजपाला ३७० जागांचे बहुमत हवं असेल तर एकूण उमेदवारांपैकी ८६ टक्के उमेदवार विजयी होणं गरजेचे आहे. परंतु सध्या भाजपाचं हे टार्गेट कठीण होत असल्याचं दिसून येत आहे.

मुद्दा १- आरक्षण संपवणारं सरकार - सरकार आरक्षण संपवणार आहे असा प्रचार आणि प्रसार करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला आहे.त्यात गृहमंत्री अमित शाह यांचा फेक व्हिडिओही व्हायरल झाला. मोदी सरकार आल्यास आरक्षण संपवणार असा प्रचार विरोधकांनी केला आहे. त्यामुळे हा मुद्दा भाजपासाठी डोकेदुखी बनला आहे.

विरोधी पक्षांच्या या टीकेवर भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यात कर्नाटकात मुस्लीम समाजाचा ओबीसीत समावेश करून ओबीसींच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. धर्माच्या आधारे काँग्रेसला देशात आरक्षण द्यायचं आहे असा आरोप भाजपाकडून केला जात आहे.

मुद्दा २ - संविधान वाचवा, लोकशाही वाचवा. मागील १५ दिवसांपासून देशात संविधान वाचवण्यासाठी दोन्ही बाजूकडून हल्लाबोल सुरू आहे. भाजपाला ४०० पार बहुमत देशातील संविधान बदलासाठी हवं आहे. जर ते पु्न्हा सत्तेत आले तर संविधान बदलतील असा प्रसार विरोधकांकडून केला जात आहे.

ज्यारितीने ईडी-सीबीआयच्या माध्यमातून सरकार मनमानी करत आहे. विरोधी पक्षांवर दबाव तंत्र वापरून नेत्यांना जेलमध्ये टाकत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्यासारख्या नेत्यांना जेलमध्ये टाकल्याने विरोधकांनी लोकशाही वाचवा असं आवाहन देशातील जनतेला केलं आहे.

मुद्दा ३ - जेडीएस नेत्याचं सेक्स स्कँडल - २ दिवसांपूर्वीच देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवन्ना यांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालेत. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. शेकडो महिलांसोबत रेवन्ना यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

प्रज्ज्वल रेवन्ना हा मुद्दा देशभरात चर्चेत आहे. इंडिया आघाडीने या मुद्द्यावरून भाजपाला कोंडीत पकडलं आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनीही मोदींना लक्ष्य केले आहे. प्रज्ज्वल रेवन्ना यांचं सेक्स स्कँडल बाहेर काढलं, त्याला मत द्या, माझे हात बळकट होतील असं आवाहन मोदी करतायेत. ही तुमची संस्कृती, अटलजींचा आत्मा रडत असेल. सेक्स स्कँडल करणाऱ्यांची घराणेशाही तुम्हाला चालते असं ठाकरेंनी म्हटलं.

मुद्दा ४ - अबकी बार ४०० पार, भाजपाचा अबकी बार ४०० पार चा नारा आता उलटा पडला आहे. भाजपा कार्यकर्त्यांसाठी हा नारा उत्साहकारक असला तरी भाजपाच विजयी होणार यामुळे अनेक भाजपा मतदार मतदान केंद्रापर्यंतही पोहचत नसल्याचे दिसते.

भाजपाच्या विजयासाठी एक मत न दिल्याने काय फरक पडेल, देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे निश्चित आहे अशा प्रकारे हावभाव असल्याने अनेक कार्यकर्ते निश्चिंत आणि भाजपा मतदार आत्मविश्वासात रंगला आहे. त्यामुळे अबकी बार ४०० पारचा नारा भाजपाच्या अंगलट येतो का असं बोललं जात आहे.