नवी मुंबईसह पनवेलवर भाजपचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 12:47 AM2019-10-25T00:47:03+5:302019-10-25T00:47:28+5:30

राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र असलेल्या नवी मुंबई परिसरामध्ये भाजपने एकहाती वर्चस्व प्राप्त केले आहे.

BJP dominates Panvel with Navi Mumbai | नवी मुंबईसह पनवेलवर भाजपचे वर्चस्व

नवी मुंबईसह पनवेलवर भाजपचे वर्चस्व

Next

नवी मुंबई, पनवेल : राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र असलेल्या नवी मुंबई परिसरामध्ये भाजपने एकहाती वर्चस्व प्राप्त केले आहे. ऐरोली, बेलापूर व उरणमध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला असून उरणमध्येही भाजपच्या बंडखोर उमेदवाराने विजय मिळविला होता. राष्ट्रवादीसह शेतकरी कामगार पक्षाचे बालेकिल्ले ढासळले असून शिवसेनेलाही धक्का बसला आहे.

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, जेएनपीटी सारखे महत्त्वाचे प्रकल्प. ‘नैना’च्या माध्यमातून निर्माण होणारी नवीन शहरे व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबई, पनवेल व उरण परिसराला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले होते. पाच वर्षांपूर्वी या परिसरामध्ये राष्ट्रवादी, काँगे्रस व शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी २०१४ पासून भाजपने प्रयत्न सुरू केले.

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर व पनवेल विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेतले व २०१९ मध्ये चारही मतदारसंघ मिळविण्यासाठी रणनीती तयार केली होती. याचाच भाग म्हणून नवी मुंबईमधून गणेश नाईक यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. ऐरोली मतदारसंघामधून भाजपच्या गणेश नाईक यांनी एकहाती विजय मिळविला आहे. त्यांनी तब्बल ७८ हजार ४९१ मतांनी विजय मिळविला आहे. बेलापूर मतदारसंघामधून मंदा म्हात्रे यांनीही तब्बल ४४,१५७ मतांनी विजय मिळविला आहे. पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. तब्बल ९२ हजार ३७० मतांनी विजय मिळविला आहे.

नवी मुंबई परिसरातील सर्वाधिक मताधिक्य ठाकूर यांनी घेतले आहे. उरणमध्ये भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार महेश बालदी हे ५,७१८ मतांनी विजयी झाले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील दोन्ही महानगरपालिका व एक नगरपालिकेमध्ये भाजपने वर्चस्व मिळविले आहे. याबरोबर आता येथील विधानसभा क्षेत्रावरही मजबूत पकड मिळविली आहे. यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. यापूर्वी नवी मुंबई हा राष्ट्रवादी काँगे्रसचा बालेकिल्ला होता. गत निवडणुकीमध्ये बेलापूर हातातून गेले व या वर्षी ऐरोलीमध्येही पराभव झाल्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संघटन वाढविण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

पनवेल हा १९६२ पासून शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. २००९ मध्ये काँग्रेसने पनवेल जिंकले व २०१४ व या वेळीही भाजपने विजय मिळविला. उरणही मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेने विजय मिळविला होता. या वेळी पुन्हा तेथे विजय मिळविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने प्रयत्न सुरू केले होते; परंतु कार्यकर्त्यांना त्यामध्ये यश आले नाही. माजी आमदार विवेक पाटील यांचा उरणमधून पराभव झाला असून शेकापला मोठा धक्का बसला आहे.

भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

नवी मुंबई, पनवेलमधील तीन मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला आहे. यामुळे मतदान केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे वाजवून व गुलाल उधळून जल्लोष केला. फटाक्यांची आतशबाजी करून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. उरणमध्ये बंडखोर उमेदवार विजयी झाल्यामुळेही भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निकालांची ठळक वैशिष्ट्ये
यापूर्वी राष्ट्रवादी काँगे्रस, शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेसचा गड असलेल्या नवी मुंबई, पनवेल परिसरावर भाजपने पूर्णपणे वर्चस्व मिळविले आहे.

माजी मंत्री गणेश नाईक यांना मागील निवडणुकीमध्ये पराभवास सामोरे जावे लागले हाते. या वेळी आयत्या वेळी बेलापूर ऐवजी ऐरोलीमधून निवडणूक लढवावी लागली. त्यांनी ७८,४९१ मतांनी विजय मिळवून पुन्हा दमदार एंट्री केली आहे. उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार विवेक पाटील यांचा पराभव शेकापसाठी धक्कादायक ठरला आहे. बेलापूर, ऐरोली, पनवेल, उरण या चार मतदारसंघांमध्ये तब्ब्ल २४ हजार ४४८ मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. शिवसेनेला उरणमधील हक्काची जागाही राखता आली नाही. भाजपच्या बंडखोराने या ठिकाणी विजय मिळविला.

 

Web Title: BJP dominates Panvel with Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.