'कोणी त्यांच्या वाट्याला गेलं तर..'; 'हिरामंडी'च्या सेटवर असं होतं भन्साळींचं वागणं, सोनाक्षीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 01:06 PM2024-05-10T13:06:50+5:302024-05-10T13:07:20+5:30

Sonakshi sinha: संजय लीला भन्साळी त्यांच्या तापट स्वभावामुळे कायम चर्चेत येत असतात. त्यांच्या स्वभावाविषयी इंडस्ट्रीत साऱ्यांनाच ठावूक आहे.

sonakshi-sinha-revelas-whether-sanjay-leela-bhansali-throws-phones-at-actors-in-anger | 'कोणी त्यांच्या वाट्याला गेलं तर..'; 'हिरामंडी'च्या सेटवर असं होतं भन्साळींचं वागणं, सोनाक्षीने केला खुलासा

'कोणी त्यांच्या वाट्याला गेलं तर..'; 'हिरामंडी'च्या सेटवर असं होतं भन्साळींचं वागणं, सोनाक्षीने केला खुलासा

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali)  यांनी अलिकडेच हिरामंडीच्या (Heeramandi) माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं आहे. सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha) , मनिषा कोईराला, संजिदा शेख, रिचा चड्ढा यांची मुख्य भूमिका असलेली ही सीरिज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.  त्यामुळे त्यातील कलाकार सातत्याने चर्चेत येत आहेत. यामध्ये अलिकडेच सोनाक्षीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने हिरामंडीच्या सेटवरील वातावरण आणि संजय लीला भन्साळी यांचं कलाकारांसोबतचं वागणं यावर भाष्य केलं.

संजय लीला भन्साळी त्यांच्या तापट स्वभावामुळे कायम चर्चेत येत असतात. त्यांच्या स्वभावाविषयी इंडस्ट्रीत साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे रागाच्या भरात ते हातातली वस्तू किंवा मोबाईल एखाद्यावर फेकतात असं म्हटलं जातं. याचविषयी सोनाक्षीला एक प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला.

"मी खोटं बोलणार नाही. पण, सुरुवातीला मी खूप घाबरले होते. मात्र, ज्यावेळी मी काम करायला सुरुवात केली त्यावेळी मी त्यांच्या व्हिजननुसार, ते पात्र फुलवत गेले जे त्यांना आवडत होतं. त्यांना सुद्धा माझ्यासोबत काम करणं सोपं गेलं. सध्या असं कोणीही नाही जे त्यांच्यासारखा सिनेमा करु शकतील. आपल्या देशात तर नक्कीच कोणी नाही तसं. त्यामुळे जर कोणी त्यांच्या व्हिजनला जोड देत असेल तर तो एकाप्रकारे सारखाच विचार करत आहे. ते सेटवर फार आनंदात असतात. पण, कोणी त्यांच्या वाट्याला गेलं तर मग ते चिडतात", असं सोनाक्षी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "एक सीन होता ज्यात मल्लिकाजानमुळे माझा नथ उतराईचा कार्यक्रम विस्कळीत होतो. ती माझ्याकडे येते आणि माझ्यासमोर पैसे टाकून निघून जाते. ज्यामुळे मी खूप चिडते, अपमान झाल्याची भावना माझ्या मनात येते असा सीन होता. त्यात मला हे सगळे भाव दाखवायचे होते. या सीनसाठी आम्ही सुमारे १५ ते १६ टेक दिले. तरी शेवटच्या टेकला त्यांनी मला विचारलं की,  'तुला वाटतंय का आपल्याला हवं ते मिळालं? तुम्हाला अजून एक करायचा आहे असं वाटतं का?’ मी त्यावर नाही म्हटलं. 'मला वाटतंय तुम्हाला हवा असलेला सीन मिळाला आहे', असं उत्तर मी दिलं. त्यावर त्यांनी 'तू फार आळशी झाली आहेस' असं उत्तर दिलं".

दरम्यान, 'इंडिया टुडे'ला तिने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने 'संजय लीला भन्साळी रागाच्या भरात मोबाईल फेकतात का?' या प्रश्नाचं उत्तर दिलं. "या सगळ्या अफवा आहेत.  पण, ते टास्क मास्टर आहेत हे मी नाकारु शकत नाही. मात्र, तो त्यांचा पूर्ण हक्क आहे. कारण, ते जे काही करतात त्यात ती जादू पडद्यावर दिसून येते."

Web Title: sonakshi-sinha-revelas-whether-sanjay-leela-bhansali-throws-phones-at-actors-in-anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.