हम तो चले परदेस...
By Admin | Updated: October 23, 2016 04:17 IST2016-10-23T04:17:53+5:302016-10-23T04:17:53+5:30
मिस अर्थ अमृता पत्कीने ‘सत्य सावित्री सत्यवान’ या मराठी चित्रपटात काम केले होते. आता ती पुन्हा एकदा ‘कौल मनाचा’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाबाबत

हम तो चले परदेस...
मिस अर्थ अमृता पत्कीने ‘सत्य सावित्री सत्यवान’ या मराठी चित्रपटात काम केले होते. आता ती पुन्हा एकदा ‘कौल मनाचा’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाबाबत आणि तिच्या पुढच्या प्रवासाबाबत तिने लोकमत सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...
कौल मनाचा हा चित्रपट स्वीकारण्यामागे काही कारण होते का?
कौल मनाचा हा चित्रपट मी करायचा ठरवले, त्या वेळी ना मी त्या चित्रपटाची कथा ऐकली होती, ना चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा. या चित्रपटाचे निर्माते राजेश पाटील हे अतिशय जुने मेकअपमन आहेत. ते गेली ३०-४० वर्षे इंडस्ट्रीत काम करीत आहेत. त्यांनी त्यांच्या कष्टातून कमावलेल्या पैशातून एखादा चित्रपट करण्याचे ठरवले. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्याने चित्रपटाचा विषयही न ऐकता मी हा चित्रपट करण्यास होकार दिला.
आज तुला एक प्रसिद्ध मॉडेल म्हणून ओळखले जाते. तुझ्या या प्रवासाची सुरुवात कशी झाली?
मला लहानपणापासूनच नृत्यात आणि अभिनयात अधिक रस होता. त्यामुळे नेहमीच माझ्या घरातल्यांनी मला यासाठी प्रोत्साहन दिले. मी कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंग करीत असे. त्या वेळी कॉलेजमधील एका फॅशन शोच्या वेळी मला एका कोरिओग्राफरने पाहिले आणि ‘मिस मुंबई’त भाग घेण्यास सुचवले. त्यानंतर मी अनेक स्पर्धा जिंकत गेले.
तू अभिनेत्री असण्यासोबतच एक पायलटदेखील आहेस. हा कोर्स करावा, असा विचार तू केव्हा केलास?
मला नेहमीच नवीन काहीतरी करायला आवडते. स्काय डायव्हिंग तर माझे पॅशन आहे. एकदा मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारत असताना मला या कोर्सविषयी कळाले आणि मी हा कोर्स करण्याचे ठरवले. मला आता विमान चालवता येते. सगळ्यात पहिल्यांदा मी विमान चालवले, त्या वेळी मला झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
तू भारत सोडण्याचा निर्णय घेतला आहेस, हे खरे आहे का?
हो, मी आता सिंगापूरमध्ये सेटल होणार आहे. तिथे फॅशन एक्स्पर्ट म्हणून काम करण्याचा माझा विचार आहे. पण, सिंगापूरला गेल्यानंतर मी चित्रपटात, मालिकेत काम करणे सोडणार नाही. मी महिन्यातील काही दिवस तरी भारतात येऊन काम करणार आहे. खरे तर मला फिरायला खूप आवडते. पैसा, प्रसिद्धी यांच्यामागे धावण्यापेक्षा प्रत्येकाने आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. त्यामुळे आता मी कामासोबतच आयुष्य एन्जॉय करण्याचा विचार केला आहे.
- Prajakta Chitnis