Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 21:50 IST2025-06-19T21:49:35+5:302025-06-19T21:50:14+5:30
Vivek Lagoo Death: लेखक, संगीत दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
Vivek Lagoo Passes Away: मराठी मनोरंजनसृ्ष्टीतून दु:खद बातमी आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं आज निधन झालं आहे. लेखक, संगीत दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख होती. अनेक वर्षांपासून ते इंडस्ट्रीत काम करत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. उद्या २० जून रोजी सकाळी दहा वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विवेक लागू यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांना लेखन आणि दिग्दर्शनाची आवड होती. हीच आवड त्यांना मुंबईत घेऊन आली. त्यांनी रंगभूमीवरुन करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला ते लेखन, दिग्दर्शन करायचे. काही नाटकांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला. शिवाय संगीतातही त्यांची रुची होती. मात्र अपघातानेच ते अभिनयाकडे वळले. विजय मेहता यांच्या शिबिरात येण्याची त्यांना संधी मिळाली होती. मात्र त्या शिबिरात केवळ अभिनयाचेच धडे देणार होत्या. मुंबईत १ महिना फुकट राहता येणार होतं म्हणून त्यांनी शिबीर जॉइन केलं आणि अभिनय शिकले. दिग्दर्शनाची आवड असूनही त्यांनी अभिनयही चांगला केला. इतकंच नाही तर अभिनयातही त्यांनी पुरस्कार मिळवले.
विवेक लागू हे बँकेत काम करायचे. तिथे काम करता करताच ते इंडस्ट्रीतही काम करत होते. काही वर्षांनी त्यांनी नोकरी सोडली. टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चाललेली आणि गाजलेली मालिका 'चार दिवस सासूचे' मध्ये त्यांनी काम केलं. त्यांनी शेक्सपियरची दोन नाटकंही केली. 'अगली', 'व्हॉट अबाऊट सावरकर', 'सर्व मंगल सावधान' या सिनेमांमध्ये ते होते.
वैयक्तिक आयुष्याविषयी
विवेक लागू यांनी १९७८ साली रीमा लागू यांच्याशी लग्न केलं होतं. रंगभूमीवर काम करतानाच त्यांची ओळख झाली होती. पहिल्या नजरेतच दोघं प्रेमात पडले होते. १९८८ साली त्यांना मुलगी झाली. तिचं नाव मृण्मयी लागू आहे. लग्नानंतर दोघांचं करिअरही सुसाट होतं. १० वर्षांनी त्यांना मुलगी झाली होती. मात्र त्यांच्यात काही कारणाने मतभेद होत होते. खटके उडायचे. १९८८ सालीच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर दोघांनी परत दुसरं लग्न केलं नाही. शिवाय वेगळं झाल्यानंतरही त्यांनी नाटकात पुन्हा एकत्र कामही केलं होतं. त्यांची मुलगी मृण्मयी आज एक यशस्वी लेखिका आहे. तिने तापसी पन्नू अभिनीत 'थप्पड' हा गाजलेला सिनेमा लिहिला. शिवाय 'स्कूप' ही सीरिजही लिहिली.