आज बॉलिवूडमधील 'काका' राजेश खन्ना यांची पुण्यतिथी
By Admin | Updated: July 18, 2016 07:56 IST2016-07-18T07:38:52+5:302016-07-18T07:56:05+5:30
सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी त्यांच्या काकांनी त्यांचे राजेश खन्ना असे नवे बारसे केले. राजेश खन्ना यांनी १९६६ साली ‘आखरी खत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले.

आज बॉलिवूडमधील 'काका' राजेश खन्ना यांची पुण्यतिथी
>संजीव वेलणकर -
पुणे, दि. 18 - जन्म:- २९ डिसेंबर १९४२
जतीन खन्ना हे राजेश खन्ना यांचे मूळ नाव. सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी त्यांच्या काकांनी त्यांचे राजेश खन्ना असे नवे बारसे केले. राजेश खन्ना यांनी १९६६ साली ‘आखरी खत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. १९६५ साली युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअर यांच्या वतीने देशभरात टॅलेंट हंट स्पर्धा घेण्यात आली होती, त्यामध्ये राजेश खन्ना अंतिम विजेते ठरले होते. त्यावेळी बक्षीस म्हणून चेतन आनंद दिग्दर्शित आखरी खत आणि रवींद्र दवे दिग्दर्शित राज या दोन चित्रपटांमध्ये त्यांना हिरो म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
१९६७ साली भारतातून आखरी खत या सिनेमाची ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ श्रेणीत ऑस्करसाठी पहिल्यांदाच शिफारस करण्यात आली होती. त्यांची अदाकारी पाहून जी. पी. सिप्पी आणि नासीर हुसैन यांनी त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये ब्रेक दिला. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटाने राजेश खन्ना यांचे आयुष्यच बदलून टाकले. शर्मिला टागोर आणि फरीदा जलाल या अभिनेत्रींसोबत आराधनामधील राजेश खन्नांचा डबल रोल प्रेक्षकांना एवढा आवडला की, ते एका रात्रीत सुपरस्टार बनले. दो रास्ते, हाथी मेरे साथी, सफर, आनंद, अमर प्रेम या सिनेमांनी त्यांच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब केले.
१९६९ ते १९७२ या काळात त्यांनी लागोपाठ १५ सुपरहिट सिनेमे दिले. त्यांचा हा विक्रम बॉलिवूडमध्ये अद्याप कुणीही मोडू शकलेले नाही. राजेश खन्ना सुपरस्टारपदावर अक्षरशः आरूढ झाले. असे होत असे की राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरूणी रस्त्यावर गर्दी करायच्या. राजेश खन्ना यांच्या स्वागतासाठी त्याकाळी तरूण मुली वेड्यासारख्या वागत असत. राजेश खन्नाच्या गाडीवर लिपस्टिकचा सडा पडत असे. रक्ताने राजेश खन्नाला लव्ह लेटर लिहिणार्या फॅन्सची संख्याही मोठी असायची. भारतात एखाद्या सिनेस्टारच्या वाट्याला प्रेक्षकांचे एवढे प्रेम पहिल्यांदाच पाहायला मिळाले.
चालण्याबोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवादफेक आणि ओठांवर कायम रूंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. राजेश खन्नांचा अभिनय, किशोर कुमार यांचे त्यांच्यासाठी पार्श्वगायन आणि आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर ८० च्या दशकापर्यंत राजेश खन्ना बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले. सर्वाधिक मानधन घेण्याचा सिलसिला त्यांनीच सुरू केला. राजेश खन्ना यांचे १९७० च्या दशकात 'आराधना' आणि 'अमर प्रेम' याबरोबरच अनेक चित्रपटांनी रौप्य आणि सुवर्णमहोत्सव साजरे केले होते.
रोमँटिक हिरो म्हणून नावारूपाला आलेले राजेश खन्ना यांचे आधी तत्कालिन फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्यासोबत सूत जुळले. परंतु त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर, मार्च १९७३ मध्ये राजेश खन्ना यांनी आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. त्यावेळी डिंपलचा बॉबी हा सिनेमा रिलीज देखील झाला नव्हता. १९९२ साली कॉंग्रेसच्या वतीने त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली आणि ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. मा.राजेश खन्ना यांचे निधन १८ जुलै २०१२ रोजी झाले.
बाबूमोशाय..... 'बाबु मोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हाथ हैं जहापनाह... जिसे ना तो आप बदल सकते हैं ना मैं... हम सब तो रंगमंच की कटपुतलियां हैं, जिसकी डोर उपरवालेकी उंगलीयोंमें बंधी हैं... कब कौन कैसे उठेगा कोई नही बता सकता...' ' आनंद ' कभी मरते नही वह हमेशा याद रहते हैं. ...we all miss you....आपल्या समुहातर्फे मा.राजेश खन्ना यांना अदरांजली
राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेली काही गाणी.
जिंदगी के सफर मेन गुजर जाते (आप की कसम)
जिंदगी कैसी है पहेली हाय (आनंद)
मेरे सपनों की रानी कब आएगी तू (आराधना)
जिंदगी प्यार का गीत है (सौतन)
अच्छा तो हम चलते हैं (आन मिलो सजना)
अगर तुम न होते (अगर तुम न होते)
चला जाता हूं (मेरे जीवन साथी)
चिंगारी कोई भड़के (अमर प्रेम)
दीवाना लेक आया है (मेरे जीवन साथी)
दिल सच्चा और चेहरा झूठा (सच्चा झूठा)
कोरा कागज था ये मन मेरा (आराधना)
कुछ तो लोग कहेंगे (अमर प्रेम)
मैं शायर बदनाम (नमक हराम)
मेरे दिल में आज क्या है (दाग)
यहां वहां सारे जहां में (आन मिलो सजना)