'लोकमान्य' मालिकेत टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेदाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 14:12 IST2023-06-27T14:11:51+5:302023-06-27T14:12:31+5:30
Lokmanya Serial : टिळक आणि आगरकर यांच्यातील मैत्रीत फूट पडणं, ही इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना होती.

'लोकमान्य' मालिकेत टिळक आणि आगरकर यांच्यातील मतभेदाला सुरुवात
टिळक आणि आगरकर यांच्यातील मैत्रीत फूट पडणं, ही इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना होती. सध्या झी मराठी वाहिनीवरील लोकमान्य मालिकेची गोष्ट या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. एकमेकांच्या विचारांशी प्रामाणिक असणारे टिळक आणि आगरकर मतभेद राखून परस्परांवर प्रेम करणारे होते. त्यांची मैत्री तुटणं, एकमेकांपासून दूर जाणं, अबोला धरणं, एकमेकांना न भेटणं असे अनेक कंगोरे लोकमान्य मालिकेत पहायला मिळणार आहेत.
न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना आणि त्यानंतर केसरी व मराठा सुरू केल्यानंतर काही वर्षांत आपापल्या भूमिकांसंदर्भात टिळक आणि आगरकरांचे मतभेद उघड होऊ लागले. आगकरांचे म्हणणे होते, राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व द्यायला हवे, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळायला हवं आणि सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. याच कारणांमुळे त्यांच्यातील मतभेदाची दरी रूंदावत गेली.
म्हणून आगरकारांनी दिला केसरीचा राजीनामा
संमतीवयावरून आणि बालविवाहाच्या प्रश्नावरून त्यांच्यातील मतभेद विकोपाला गेले. त्यामुळे केसरीतून सुधारणावादी मत मांडताना आगरकरांची घुसमट होऊ लागली. म्हणून आगरकारांनी केसरीचा राजीनामा दिला. त्यानंतर आगरकर आणि टिळक जिथे एकत्र राहत होते, ते घरही आगरकरांनी सोडलं. दोघांच्या घनिष्ट मैत्रीमध्ये आलेला हा दुरावा, दोघांनी त्या त्या वेळी घेतलेले निर्णय, मांडलेले विचार यांचे प्रभावी चित्रण लोकमान्य मालिकेत पहायला मिळणार आहे. लोकमान्य मालिका बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर पाहायला मिळेल.