सासरी जाताना 'या' गोष्टी गांभीर्याने घेऊ नका! तेजश्री प्रधानचा नवीन लग्न झालेल्या मुलींना रोखठोक सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 10:37 IST2026-01-28T10:36:47+5:302026-01-28T10:37:53+5:30
तेजश्रीनं नवविवाहित मुलींना नेमकं काय सांगितलं?

सासरी जाताना 'या' गोष्टी गांभीर्याने घेऊ नका! तेजश्री प्रधानचा नवीन लग्न झालेल्या मुलींना रोखठोक सल्ला
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या लोकप्रिय मालिकेमुळे चर्चेत आहे. यात ती स्वानंदीची भूमिका साकारतेय तर सुबोध भावे समरची भूमिका निभावतो आहे. नुकताच झी मराठीने तेजश्रीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने सासरी जाणाऱ्या मुलींना एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी सल्ला दिला आहे. या व्हिडीओने सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तेजश्रीला एक चिठ्ठी दिली जाते, ज्यामध्ये विचारले असते की, "अशी कोणती गोष्ट आहे जी मी 'लाईटली' (सहजपणे) घेतली पाहिजे?" यावर तेजश्री म्हणाली, "आपण अगदी लहान असल्यापासून ऐकत आलोय की, उद्या तुम्ही सासरी गेल्यानंतर सासरच्या मंडळींचा आदर करा. ते काहीही बोलले तरी त्याला पूर्व दिशा समजा आणि तसंच वागा. आपण हे खूप गांभीर्याने घेतो. मला असं वाटतं की, आता वेळ आली आहे, तुम्ही हे थोडं कमी गांभीर्याने घेतलं पाहिजे".
ती पुढे म्हणाली, "कशा अर्थाने? तर जर तुम्हाला माहित असेल की तुम्ही चुकीच्या नाही आहात आणि तुमची बाजू सत्याची आहे, तर तुम्ही त्याबद्दल नक्कीच बोला". सासरच्या लोकांचा आदर करताना स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड करू नका, असा सल्ला तेजश्रीने दिला आहे. तेजश्रीचा हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक महिलांनी तिचे समर्थन केलं आहे. एका युजरने म्हटले, "अगदी बरोबर! सत्यासाठी बोलणं गरजेचं आहे", तर दुसऱ्याने लिहिले, "नेहमीच आवडती अभिनेत्री, खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहेस".