‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या लेखकाची आत्महत्या, कुटुंबाने केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 14:53 IST2020-12-04T14:52:08+5:302020-12-04T14:53:35+5:30
मला माफ करा...; सूसाईड नोट सापडली

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या लेखकाची आत्महत्या, कुटुंबाने केले गंभीर आरोप
2020 या वर्षांत मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला. आता आणखी एक धक्कादायक बातमी आली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेच्या लेखकांपैकी एक अभिषेक मकवाना याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. अभिषेक अनेक वर्षांपासून या मालिकेसाठी लेखक म्हणून काम करत होता. आत्महत्येपूर्वी अभिषेकने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. आर्थिक समस्यांना वैतागून आत्महत्या करत असल्याचे त्यात त्याने नमूद केले आहे. दरम्यान अभिषेकच्या कुटुंबाने मात्र सायबर फसवणूक व ब्लॅकमेलिंगमुळे अभिषेकने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.
गेल्या 27 नोव्हेंबरला अभिषेकचा मृतदेह त्याच्या कांदीवलीस्थित फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूची केस दाखल केली आहे. याप्रकरणी कुटुंबियांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
कुटुंबाचा आरोप
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेक सायबर फ्रॉड आणि ब्लॅकमेलिंग बळी ठरल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. अभिषेकच्या मृत्यूनंतरही त्याला सतत फोन येत आहेत. काही लोक पैशांची मागणी करत आहेत. अभिषेकने त्यांना लोनसाठी गॅरंटर बनवले होते. अभिषेकचा भाऊ जेनिस याने सांगितले की, अभिषेकच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा आपण अहमदाबादेत होतो. माझ्या भावाची फसवणूक झाली, हे मला रविवारी कळले. कर्ज देणारे त्याला फोन करू लागल्यानंतर आम्हाला याबद्दल कळले. काही फोन बांगलादेशच्या नंबरवरून, काही म्यानमारच्या नंबरवरून तर काही भारतातील वेगळ्या राज्यांतून आले. मी भावाचे ईमेल्स चेक केलेत, तेव्हा ‘ईजी लोन’ या अॅपद्वारे त्याने लहान कर्ज घेतल्याचे मला कळले. याचे व्याजदर अव्वाच्या सव्वा होते. या अॅपबद्दल माहिती काढल्यावर हा सायबर फ्रॉडचा प्रकार असल्याचे कळले. माझ्या भावाच्या फोनमध्ये काही मॅसेज आहेत. यावरून त्याला ब्लॅकमेल केले जात होते, हे स्पष्ट होते.
सूसाईड नोट गुजरातीत
अभिषेकने मृत्यूपूर्वी लिहिलेली सूसाईड नोट गुजरातीत आहे. यात त्याने आर्थिक समस्यांचा उल्लेख केला आहे. मी परिस्थितीशी लढण्याचे बरेच प्रयत्न केलेत. पण अपयशी ठरलो. आता मी हरलो आहे, असे लिहित त्याने कुटुंबाची माफी मागितली आहे.