जसं दिसतं तस नसतं, केवळ 8 महिनेच टिकले या अभिनेत्रीचे दुसरे लग्न, पतीच्या रोजच्या मारहाणीमुळे झाली होती त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 06:00 IST2020-07-07T06:00:00+5:302020-07-07T06:00:01+5:30
सगळ्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत केल्याबद्दल आईवडिलांची आणि जवळच्या लोकांची ऋणी आहे असंही तिने म्हटले आहे. "पुरुषांना त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी स्त्रिया आवडत नाही.

जसं दिसतं तस नसतं, केवळ 8 महिनेच टिकले या अभिनेत्रीचे दुसरे लग्न, पतीच्या रोजच्या मारहाणीमुळे झाली होती त्रस्त
रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. मात्र चंदेरी दुनियेतील काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरतात. अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये आणखी एका मराठी अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. वीरा फेम अभिनेत्री स्नेहा वाघ हिनं एकदा नाही तर दोनदा लग्न केलं.
मात्र दोन्ही लग्न फार काळ टिकली नाहीत. खुद्द स्नेहानं समोर येत याबाबत खुलासा केला आहे. अनुराग सोलंकी या इंटिरिअर डिझायनरसह स्नेहा दुस-यांदा रेशीमगाठीत अडकली होती. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. अवघ्या ८ महिन्यांतच दोघांत बेबनाव झाला आणि ते वेगळे राहू लागले. गेल्या वर्षभरापासून हे दोघे वेगळे राहत आहेत. लवकरच त्यांचा घटस्फोट होणार आहे. स्नेहाने घरगुती हिंसाचारामुळे हा निर्णय घेतल्याचे समोर आले होते. स्वतः स्नेहानं याचा खुलासा केला आहे. स्नेहाच्या पहिल्या लग्नाबाबतही असंच काहीसं घडलं होतं.
वयाच्या १९व्या वर्षी स्नेहाचे पहिले लग्न झाले होते. त्या लग्नानंतरही तिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. त्यावेळी सारं काही जवळपास ७ वर्ष सहन केल्याचं तिने सांगितले आहे. या सा-याने परिसीमा गाठल्यानंतर तिने त्या नात्यातून बाहेर येण्याचा निर्णय घेतला. मात्र दुर्दैवानं स्नेहाचं दुसरं लग्नसुद्धा ८ महिन्यांपेक्षा जास्त टिकू शकलं नाही. या सगळ्या काळात आपण भेदरल्याचे तसंच खचून गेल्याचंही स्नेहाने नमूद केले आहे. तरीही या कठीण समयी आणि आव्हानात्मक परिस्थितीत आईवडिल, कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी खंबीरपणे साथ दिल्याचे तिने सांगितले आहे.
सगळ्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत केल्याबद्दल आईवडिलांची आणि जवळच्या लोकांची ऋणी आहे असंही तिने म्हटले आहे. "पुरुषांना त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी स्त्रिया आवडत नाही. मला असे जाणवले की मी या व्यक्तीसोबत माझे संपूर्ण आयुष्य काढू शकत नाही. मी नेहमीच माझ्या विचारांवर आणि कृतींवर ठाम राहिलेली आहे. आता मी लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय करायचे आहे आणि कसे जगायचे आहे याचा विचार करणार आहे. लग्न आणि प्रेम हे दोन्ही विषय माझ्यासाठी आता पूर्णपणे संपले आहेत", असंही स्नेहाने म्हटले होते.