'बिग बॉस मराठी ६'च्या घरातून बाहेर आल्यावर सागर कारंडेची पहिली प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 10:04 IST2026-04-07T10:04:21+5:302026-04-07T10:04:38+5:30
'बिग बॉस मराठी ६'मधून एक्झिट घेतल्यानंतर सागर कारंडेनं शेअर केली पोस्ट; म्हणाला...

'बिग बॉस मराठी ६'च्या घरातून बाहेर आल्यावर सागर कारंडेची पहिली प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाला?
'बिग बॉस मराठी ६' हे पर्व अंतिम टप्प्यात आलं आहे. अशातच घरातील चर्चेतील सदस्य असलेल्या सागर कारंडेला घरातून एक्झिट घ्यावी लागली. विशाल कोटियन किंवा सागर कारंडे या दोघांपैकी एकाचा प्रवास संपणार होता. होस्ट रितेश देशमुखनं सागर हा एलिमिनेट झाल्याचं जाहीर केलं. घरातील सदस्यांची धावती भेट घेत कसलाही ड्रामा न करता सागर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. घराबाहेर आल्यानंतर सागरनं पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
सागर कारंडे हा घरातील धडाकेबाज स्पर्धक मानला जात होता. टास्कमध्ये त्याची मेहनत दिसत होती, प्रेक्षकांचाही चांगला पाठिंबा होता. पण अखेर कमी मतांमुळे सागर कारंडेला शो सोडावा लागला. घरातून बाहेर पडताच सागर कारंडेनं सोशल मीडियावर चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर केली. त्याने लिहिलं, "तुमच्या प्रेमानेच मला प्रत्येक कठीण क्षणी उभं राहायला ताकद दिली. तुमचा प्रत्येक शब्द, प्रत्येक सपोर्ट माझ्यासाठी प्रेरणा बनला. ही फक्त माझी जर्नी नाही… ही आपली सगळ्यांची जर्नी आहे".
पुढे त्यानं लिहलं, "तुम्ही सोबत होता म्हणूनच प्रत्येक टप्पा खास झाला. कधी पडलो, कधी थकलो… पण तुमच्या प्रेमामुळे पुन्हा उभा राहिलो. तुमचा विश्वास हेच माझं सर्वात मोठं यश आहे. माझ्यावर इतकं निस्वार्थ प्रेम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच प्रेम, साथ आणि आशीर्वाद कायम राहू दे! तुम्ही आहात म्हणूनच मी आहे. महाराष्ट्राच्या प्रेमाला सलाम! मनापासून आभार", या शब्दात त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, 'बिग बॉस मराठी ६' आता शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबला आहे. खेळ आता काहीच आठवड्यात संपणार आहे. बिग बॉसचा महाअंतिम सोहळा १९ एप्रिल २०२६ ला पार पडणार असल्याचं बोललं जातंय. चाहते आपल्या आवडत्या सदस्याला सपोर्ट करताना दिसतात. अनेक प्रेक्षकांसाठी आधीच विनर ठरला आहे. अनेक जण तन्वी विनर होणार असल्याचे म्हणतायत. तर काहीजणांनी विशालला ही सपोर्ट केलाय. रेवा वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून जरी आली असली तरी तन्वीने तिला खूप सांभाळून घेतलं. आता रेवाने तन्वीला सपोर्ट करायला हवा असं काहीजण म्हणताना दिसतात.